सातारा, (प्रतिनिधी)- पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊपूर्वी न भरवता नऊनंतर भरवावेत, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्यानुसार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय जारी केला. मात्र, राज्यात अनेक शाळांकडून या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती.
याबाबत दैनिक प्रभातने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने शनिवारपासून (दि. २९) या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळा आता शनिवारी सकाळी ९ ते १ या वेळेत भरणार आहेत.
अन्य माध्यमांच्या शाळांनाही या आदेशाची अंलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून तसे न केल्यास अशा शाळांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
या आदेशाची अंमलबजावणी अनेक शाळांच्या व्यवस्थापनाकडून होत नाही, परिणामी पालक व व्यवस्थापनामध्ये खटके उडत असल्याबाबत दै. प्रभातने वृत्त प्रसिध्द केले होते.
त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेत शनिवारी जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील अन्य माध्यमांच्या शाळांनाही तशा सूचना करण्यात आल्या आहेत.
सर्व व्यवस्थापन, माध्यमांचे पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरण्याबाबत सूचना आहेत. सकाळी नऊपूर्वी शाळा भरवायच्या आहेत त्यांनी तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. काही शाळांनी मांडलेल्या अडचणींची माहिती घेण्यात येत आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे सर्व माध्यमांच्या शाळांवर बंधनकारक आहे. – शबनम मुजावर ( शिक्षणाधिकारी प्राथमिक)