सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥
तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥
पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥
तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥
लक्षावधी वारकऱ्यांसह शहरात मुक्कामी असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये पहाटेपासूनच नागरिकांची रांग लागली होती.
रविवारी रात्री उशिरा दोन्ही पालख्यांचे पुण्यात आगमन झाले. सोमवारची सकाळ ही पुणेकरांसाठी भक्तीमय झाली. ठिकठिकाणी दिसणारे वारकरी, टाळांचे, अभंगांचे, कीर्तनाचा सूर ठिकठिकाणी कानावर पडत होते. शहरातील पूर्व भागात जास्त दिंड्या मुक्कामी असतात. त्यामुळे हा भाग गर्दीने फुलला होता.
चौकाचौकात ध्वनिवर्धकांवरून लावण्यात आलेल्या अभंगांचे सूर कानात साठवत दर्शनासाठी पहाटेपासूनच तीन-तीन तास रांगेत थांबलेले भाविक, चर्मकार, नाभिक समान, पायांना मसाज करणारे लोक अशी मनोभावे सेवा करणारे कार्यकर्ते आणि भजन-कीर्तनासह मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या वारकऱ्यांनी केलेला पांडुरंगाचा धावा अशा वातावरणामुळे जणू भक्तीचा मळा फुलला होता.
मंदिरामध्ये पहाटे काकड आरती, अभिषेक-पूजा झाल्यानंतर दिवसभर हरिनामाचा जागर करण्यात आला. दुपारी आळंदी देवस्थानच्या वतीने प्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला. पालखी विठ्ठल देवस्थानच्या वतीने वारकरी, बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये पहाटेपासूनच नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरामध्ये पहाटे पांडुरंगाची काकड आरती, अभिषेक आणि पूजा झाली. देवस्थानच्या वतीने पालखी आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. वारकऱ्यांसाठी अन्नदान करण्यात आले. दिवसभरात धूपारती, कीर्तन सेवा आणि रात्री जागर करण्यात आला.