Uddhav Thackeray । २७ जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्वपक्षीय नेते आणि आमदार विधीमंडळात दाखल झाले होते.
यावेळी शिसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख तसेच विधान परिषदेतील आमदार उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी विधानभवनातील एकाच लिफ्टने प्रवास केला होता. तर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांना चॉकलेट दिलं. यावरून येत्या विधान सभा निवडणुकीत जुने मित्र एकत्र येत निवडणूक लढणार का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. या चर्चांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली ते
उद्धव ठाकरे हे महायुतीत येणार का? या प्रश्नांवर संजय राऊत म्हणाले,’ अनेकदा दिल्लीत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्रीही आमच्या लिफ्टमध्ये असतात. महाराष्ट्राच्या विधान भवनात व्यवस्था अशी आहे की, एकत्रच लिफ्टने प्रवास करायचा असतो.’
‘एकाच सभागृहात जायचं असतं. दोन नेते समोरासमोर आले तर नमस्कार करणं हा शिष्टाचार असतो. त्या शिष्टाचारानुसार एकमेकांनी एकमेकांना नमस्कार केला असेल तर त्यात राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत पुन्हा हात मिळवणार नाही. आम्ही आमचे हात अपवित्र करून घेणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तर उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले होतेकी,’लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी त्याचा विचार करावा.’ असं उत्तर त्यांनी आहे.