सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील सिंचन आणि पुनर्वसनाच्या प्रश्नांसह विकासाचे अनेक प्रकल्प निधी अभावी रखडून पडले आहेत. यामध्ये मेडिकल कॉलेजच्या इमारतीची परिपुर्तता, सातारा नगरपालिकेची रखडलेली इमारत, बोंडारवाडी सिंचन प्रकल्प, सातारा शहराच्या हद्दवाढीचा वाढीव निधी, माण तालुक्यातील ग्रीन कॉरिडॉर महामार्गाचे काम,
अवैध वाळू उत्खनन, कराड तालुक्यातील टोल आकारणी कराड विमानतळ विस्तारीकरण वाई तालुक्यात मोठ्या औद्योगिकरण क्षेत्रांचा अभाव कोरेगाव तालुक्यातील वसन वांगणा योजनांच्या निकृष्ट कामांचा विषय फलटण तालुक्यातील निरा भिमा स्थिरीकरण आणि रिंग रोड बांधणे अशा विविध विषयांना गती मिळणे आवश्यक आहे. गुरुवार, दि. 27 रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये जिल्ह्याचे हे प्रश्न मांडण्याची जबाबदारी आठही मतदारसंघातील आमदारांवर आहे.
राज्यातील महायुतीच्या सरकारपुढे कळकळीने प्रश्न मांडून या प्रश्नांना गती देण्याची जबाबदारी ही विरोधी बाकावरच्या आमदारांवर आहे. यंदाचे अधिवेशन हे महायुती सरकारचे या पंचवार्षिक मधील शेवटचे अधिवेशन असल्यामुळे त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी संपूर्ण गृहपाठ केला असून त्या दृष्टीने त्यांची काय मांडणी असणार याचे उत्तर अधिवेशनाच्या विविध सत्रांमध्ये पाहायला मिळणार आहे.
तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे आपापल्या मतदारसंघातील जास्तीत जास्त प्रश्न कसे मार्गी लागतील याकडे जिल्ह्यातील सर्व आमदारांचा कल राहणार आहे.
राज्यातील सत्तांतराचे नाट्य आणि लोकसभा निवडणुकांची धामधूम यामध्ये बराचसा वेळ व्यापक रचनात्मक कार्यक्रमांवर चर्चा होऊन त्यांना गती मिळण्यापेक्षा राजकीय सुंदोपसुंदीमध्ये गेला आहे.
त्यामुळे पावसाळी अधिवेशन हे महायुती सरकारचे या पंचवार्षिकचे शेवटचे अधिवेशन आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यू महाबळेश्वर प्रकल्प आणि त्या पट्ट्यातील पर्यटनाला चांगली गती दिली आहे.
मात्र, अजूनही भूसंपादन त्याला आवश्यक असणारा निधी रोड मॅपिंग तसेच त्याचा आराखडा या गोष्टी अंतिम टप्प्यात असल्या तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही. त्याकरता नुकतेच झालेल्या बैठकीत 381 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विविध प्रश्न आ वासून उभे
जिल्ह्यातील प्रश्नांचा जर आढावा घेतला तर सातारा तालुक्यातून बोंडारवाडी सिंचन प्रकल्प, सातारा शहरातील हद्द वाढीसाठी वाढीव निधी, घरपट्टीचा प्रश्न, मेडिकल कॉलेजला जादा निधी, हे प्रश्न आ वासून उभे आहेत माण खटाव तालुक्यामध्ये ग्रीन कॉरिडॉर एमआयडीसी,
प्रकल्पांची रखडलेली कामे, पश्चिम उत्तर माण तालुक्यातील पाणीटंचाई, अवैध वाळू उत्खनन कराड दक्षिण उत्तर मध्ये तासवडे एमआयडीसी मध्ये मोठ्या उद्योगांची वानवा, तासवडे टोलनाक्याची आकारणी,
कराड विमानतळ विस्तारीकरण, कोयना नदीकाठच्या गावांना संरक्षक भिंतीची गरज, पाटण तालुक्यामध्ये कराड चिपळूण रखडलेला महामार्ग, पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे अर्धवट काम,
उपसा सिंचन योजनांची वाढलेली पाणीपट्टी, कोयना जलाशयातील बोटिंग चा प्रश्न ,फलटण तालुक्यातील नीरा देवधर प्रकल्पाचे पाणी बंदिस्त करणे, फलटण सिंचन भवन, नीरा भीमा स्थिरीकरण, फलटण बारामती रेल्वे मार्ग,
तसेच कोरेगाव तालुक्यातील वसना वांगणा योजनांच्या निकृष्ट कामाचा विषय, एमआयडीसीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रोजगाराचा अभाव व वाई-खंडाळ-महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघातील 32 गावांचा रखडलेला पाणी प्रश्न, धोम धरणातून वाई शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजना, ऐतिहासिक मंदिरांच्या जीर्णोध्दाराचा प्रश्न असे विविध प्रश्न आ वासून उभे आहेत.
अधिवेशनात मांडावे लागणार प्रश्न
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे सहा आमदार असून महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. यामध्ये अजितदादा पवार गटाकडे वाईचे आमदार मकरंद पाटील असून तो गट महायुतीत सामील झाला आहे.
महाविकास आघाडीकडे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे असे दोन आमदार आहेत.
याशिवाय काँग्रेसचे कराड दक्षिणमधील आमदार पृथ्वीराज चव्हाण आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जबरदस्त राजकीय स्पर्धा जिल्ह्यात पाहायला मिळाली.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची बेगमी करताना विकास कामांच्या माध्यमातून त्याला उत्तर द्यावे लागणार आहे. त्या दृष्टीनेच यंदाच्या अधिवेशनात अभ्यासपूर्वक मांडणी केली जाण्याची शक्यता आहे.