मुंबई : भाजपच्या सक्रिय राजकारणातून बाजूला पडलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना थेट लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. मात्र, तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यांना विधान परिषदेवर पाठवत राजकीय पुनर्वसन करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय, 12 जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीनंतर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळातही स्थान देण्याची शक्यता आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 2019मध्ये पराभव झाला होता. त्यानंतर पक्षाकडून सातत्याने डावलले जात असल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. पण पक्षाने त्यांना थेट बीडमधून लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. तथापि, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला.
यानंतर पुन्हा एकदा त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांना राज्याच्याच राजकारणात कायम ठेवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याचे समजते. त्यानुसार, येत्या 12 जुलै रोजी 11 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या 11पैकी भाजप पाच जागा, शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी दोन जागा असतील, अशी शक्यता आहे. एवढेच नव्हे तर, त्यांना औटघकेचे मंत्रीपदही देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
येत्या 30 जून रोजी राज्यातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारला सत्तेत येऊन 2 वर्षे पूर्ण होतील. या दोन वर्षांत दोनवेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून तिसऱ्या विस्ताराकडे अनेकजण डोळे लावून बसले आहेत. आता हा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 12 जुलैनंतर होईल आणि त्यात पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, मुंडे समर्थकांच्या आत्महत्या तसेच राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असे तापलेले वातावरण लक्षात घेऊन ओबीसी चेहरा म्हणून त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व दिले जाईल, असा तर्कही मांडण्यात येत आहे.