रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन जामीन मंजूर झाल्याने तुरूंगातून बाहेर आले. आता ते पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारणार का याविषयीच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. झारखंडमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. अशात त्या राज्यातील आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) नेते ४९ वर्षीय हेमंत यांना मोठा दिलासा मिळाला. ते तुरूंगाबाहेर येण्याची घडामोड झामुमो आणि सत्तारूढ आघाडीचा उत्साह वाढवणारी ठरली आहे. त्या आघाडीमध्ये कॉंग्रेस आणि राजद या इतर पक्षांचा समावेश आहे.
हेमंत मुख्यमंत्री असताना त्यांच्यामागे जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणावरून ईडीचा ससेमिरा लागला. त्या केंद्रीय यंत्रणेने चौकशी केल्यानंतर हेमंत यांनी ३१ जानेवारीला रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही क्षणांत त्यांना अटक करण्यात आली. आता सुमारे ५ महिन्यांनंतर ते तुरूंगाबाहेर आले आहेत. ते तुरूंगात असताना झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. त्यामुळे मागील वेळी झारखंडमधील लोकसभेच्या एकूण १४ पैकी ११ जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी ८ जागांवरच समाधान मानावे लागले.
लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना झारखंडमधील सत्तारूढ आघाडीचे मनोबल उंचावले आहे. अशात हेमंत यांचे तुरूंगाबाहेर येणे त्या आघाडीच्या दृष्टीने राजकीय प्लसपॉईंट ठरला आहे. हेमंत यांच्या राजीनाम्यानंतर झामुमोचे नेते चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यांना पदावर कायम ठेवले जाणार की हेमंत पुन्हा सुत्रे स्वीकारणार ते लवकरच स्पष्ट होईल.