Gaurav More । ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अभिनेता ‘गौरव मोरे’ला मोठी लोकप्रियता मिळाली. विनोदाच्या अचूक टाईमिंगमुळे तो खास करून ओळखला जातो. या कार्यक्रमामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात दिसत नाही.
त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यानंतर स्वतः गौरवने हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ पोस्ट करत आपण ह्या कार्यक्रमातून एक्झिट घेत असल्याचं सांगितलं. गौरव मोरेने हा शो सोडल्याची माहिती दिल्याने चाहत्यांना धक्काच बसला. चाहते त्याला हा शो सोडू नको अशी सोशल मीडियावर त्याच्या पोस्टवर कंमेंट करत विनंतीही करत होते.
गौरव सध्या ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात दिसत आहे. नुकतंच या हिंदी कार्यक्रमात त्याच्यासोबत अभिनेता कुशल बद्रिके व अभिनेत्री हेमांगी कवीन स्किट सादर केले आहे. या स्किटचा व्हिडीओ गौरवने सोशल मीडियावर शेअर केला होता.
अशात नुकत्याच त्याने वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौरवने याबद्दल भाष्य केलं आहे. तो म्हणाला, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सोडण्यामागे कारण असं काहीच नव्हतं. फक्त माझ्यामध्ये तोच-तोचपणा खूप जास्त येत होता. माझ्याकडून संवाद बोलण्याआधी रिअॅक्शन येत होत्या. सलग पाच वर्षे मी हास्यजत्रेत काम केलंय त्यामुळे त्या सगळ्याची मला एक सवय झाली होती. मला असं वाटलं आपण खूपच मॅकेनिकल नाही ना झालोय?…तेव्हा असं जाणवलं की, आपण थोडं थांबायला पाहिजे.’ असं म्हणत त्याने आपली भूमिका मांडली.