मुंबई – थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला सलग दोन वर्ष प्रथम स्थानावर ठेवण्याचे काम उद्योग विभागाच्या माध्यमातून झाले असून मोठ्या प्रमाणात परदेशी उद्योगसमूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. दावोस येथे गेल्या तीन वर्षांत राज्याने केलेल्या विविध सामंजस्य करारांची, गुंतवणूक प्रकल्पाबाबतची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभाग प्रसिद्ध करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत केली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, सलग दोन वर्षांपासून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत प्रथम स्थानावर असून यावर्षी दावोस येथे 3 लाख 72 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे रत्ने आणि दागिन्यांचा मोठा प्रकल्प नवी मुंबई येथे सुरू करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात दावोस येथे उद्योग विभागाच्या तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत आणि इतर विभागांच्यावतीने किती सामंजस्य करार करण्यात आले, त्याची अंमलबजावणी या सर्वांची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभागाद्वारे काढली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.