नवी दिल्ली – ऍपल कंपनीने त्यांच्या आयफोन वापरकर्त्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मोबाईल फोनवर तुमच्या फोनवर सरकार प्रायोजित घुसखोरी करून तुमची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ऍलर्ट संदेश दिला आहे. हा संदेश ठाकरे गटाच्या राज्यसभा सदस्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्या संदेशात ऍपल कंपनीने म्हटले आहे की, तुम्हाला सरकार प्रायोजित हल्लेखारांकडून लक्ष्य केले जात आहे.
तुमच्या ऍपल आयडीशी संपर्क करून तुमच्या फोनमधील डाटा व माहिती मिळवली जात आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करीत आहात याची माहिती मिळवून या हल्लेखोरांकडून तुम्हाला लक्ष्य केले जाऊ शकते. जर सरकार प्रायोजित हल्लेखोरांचा तुमच्या फोनवर घुसखोरीचा प्रयत्न यशस्वी झाल्यास तुमच्या संबंधीत संवेदनशील माहिती मिळवून तुम्हाला लक्ष करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो.
दूर नियंत्रक पद्धतीने तुमच्या फोनचे रेकॉर्डिंग तसेच संवेदनशील माहिती मिळवण्याबरोबरच तुमच्या फोन मधील कॅमेऱ्याचाहीं गेैरवापर केला जाऊ शकतो. हा संदेश खोटा असू शकतो पण हा इशारा गांभीर्याने घ्या अशी सुचनाहीं ऍपल कंपनीने आयफोन वापरकर्त्या नेत्यांना दिला आहे.
इंडिया आघाडीतील नेत्यांचे फोन हॅक –
इंडिया आघाडीच्या सर्वच महत्वाच्या नेत्यांचे फोन हॅक केले जात असल्याचे एक सनसनाटी प्रकरण आज सकाळी उघडकीला आले. या आघाडीतील कॉंग्रेस नेते शशी थरूर, कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेरा, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चर्तुवेदी , आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमुल कॉंग्रेसच्या महुआ मोईत्रा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांच्यासह सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन सरकार प्रायोजित हल्लेखोरांकडून हॅक केले जात असल्याचा संदेश या नेत्यांना ऍपल कंपनीने दिला आहे.
हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी या ऍपल कंपनीच्या ऍलर्टची प्रत पत्रकार परिषदेत सादर करून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की माझ्या कार्यालयातील अनेक जणांच्या फोन वर हा संदेश आला आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, सुप्रिया सुळे, पवन खेरा अशा नेत्यांनाहीं असा संदेश आला आहे. अनेकांना ऍपल कंपनीकडून ईमेलद्वारेही ही माहिती पुरवण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी केला सरकारवर हल्लाबोल –
राहुल गांधी यांनी या ईमेलची प्रतही पत्रकार परिषदेत सादर केली. आम्ही जेव्हाजेव्हा अदानींच्या भानगडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आमच्यावर अशा प्रकारची हेरगिरी केली जाते आणि यंत्रणांना कामाला लावले जाते. पण तुम्ही आमच्या विरोधात कितीहीं यंत्रणा आणि माणसे कामाला लावा, मी त्याची फिकीर करीत नाही. तुम्हाला जर माझा फोनच तपासासाठी हवा असेल तर मी हा फोन तुम्हाला द्यायला तयार आहे.
मी कशालाच घाबरत नाही आम्ही आता आमचा लढा सुरू केला आहे असे राहुल गांधींनी आज पत्रकार परिषदेत सरकारला उद्देशून सांगितले. दरम्यान संबंधीत सर्वच नेत्यांनी आपल्याला आलेल्या या ऍलर्ट संदेशावरून सरकारला घेरले आहे. आमच्या फोन चे हॅकिंग करण्याशिवाय सरकारकडे आता दुसरे काही काम उरले नाही काय असा सवाल शशी थरूर यांनी सरकारला उद्देशून केला आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात ऍपल कंपनीलाच विचारा – केंद्र सरकारचा कानावर हात
इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या फोन मध्ये सरकार प्रायोजित घुसखोरी करून त्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे, ऍपल कंपनीने त्यांच्या आयफोन वापरकर्त्यांना तुमच्या फोन मध्ये अशी सरकार प्रायोजित घुसखोरी झाल्याचे संदेश पाठवले आहेत. त्यावर भाजप सरकारने हात वर केले असून या प्रकरणी विरोधी पक्षांनी ऍपल कंपनीकडेच विचारणा करावी अशी सुचना भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. त्यांनी सरकारवरील हे आरोप फेटाळून लावले आहेत.
माजी केंद्रीय आयटी मंत्री व भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले की, या संबंधात सरकारवर आरोप करण्याऐवजी या नेत्यांनी हे प्रकरण ऍपलकडे घेऊन एफआयआर दाखल करायला हवा. तथापि, त्यांनी आपल्या अनुभवाचा हवाला देऊन दावा केला की कोणतीही टेलिफोन कंपनी असे काही करत नाही.
विरोधी नेत्यांच्या आरोपाबद्दल विचारले असता, प्रसाद यांनी विरोधकांना एफआयआर दाखल करण्यापासून कोणी रोखले आहे असा सवाल केला आहे. पेगॅसस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने तपासणीसाठी राहुल गांधी यांना त्यांचा मोबाईल फोन सादर करण्यास सांगितले होते, पण त्यांनी त्यास नकार दिला होता याची आठवणही रविशंकर प्रसाद यांनी करून दिली.