पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात लाखो वारकऱ्यांसह पालखी सोहळा दाखल होण्यास काही तास शिल्लक असतानाच शहराचा पाणीपुरवठा शनिवारी विस्कळीत झाला.
पहाटे ६.३० वाजता खडकवासला जॅकवेलचा विद्युत पुरवठ्याच्या २२ केव्ही पॅनेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पर्वती आणि लष्कर जलकेंद्रचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे सर्व मध्यवर्ती पेठांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
शनिवारी दिवसभर पेठांच्या परिसरात पाणीच आले नाही. त्यामुळे शहरात एक दिवस आधीच आलेले वारकरी आणि त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा देणाऱ्या पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
तर, शहराच्या अनेक भागांत मध्यरात्रीनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
पेठांमध्ये पहाटेपासून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सकाळीच जॅकवेलचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पर्वती लष्कर, जलकेंद्रावर त्याचा परिणाम झाला आणि मध्यवर्ती पेठांमध्ये पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दोन्ही पालख्या भवानी पेठ परिसरात मुक्कामी येतात. तसेच अनेक वारकरी एक दिवस आधीच पेठांमध्ये मुक्कामी येतात.
अशा वेळी मागणी अधिक असूनही पाणीच न आल्याने नागरिकांची धावपळ झाली. त्यानंतर महापालिकेने पर्वती जलकेंद्रासाठी कालव्यातून पाणी घेत पर्वती शुद्धीकरण केंद्र सुरू केले आणि दुपारनंतर पेठ भागांत पाणीपुरवठा सुरळीत ठेवला.
अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत
जॅकवेलच्या वीज बिघाडामुळे जवळपास अर्ध्या शहराच्या पाणीपुरवठा विस्कळीत झाला. खडकवासला धरणातून पर्वती, वडगाव आणि लष्कर जलशुद्धीकरण केंद्रात कच्चे पाणी दिले जाते.
या केंद्रावर सर्व मध्यवर्ती पेठा, सिंहगड रस्ता. सातारा रस्ता परिसर, हडपसर, कॅम्प परिसर, नगर रस्त्याचा काही भागांत पाणी दिले जाते. पण, ऐन पालखीच्या एक दिवस आधी पाणी बंद ठेवावे लागले.
सकाळी साडेसहा वाजता खडकवासला जॅकवेलचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर, सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. पेठांमध्ये आणि पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. – नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, मनपा