नागपूर – राजकीय वर्तुळात मागील अनेक दिवसांपासून मोठ्या घडामोडी होत आहे. राज्यातील सत्तांतरानंतर भाजपने ठाकरे गटावर निशाणा साधला. यावरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आता पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बावनकुळे यांनी आता सत्तेचे व्यसन लागले असल्याची टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “आमच्यासाठी सत्ता हे साध्य नाही तर जनकल्याणाचे आणि अंत्योदयाचे साधन आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजिर खुपसला. त्यांना आता सत्तेचे व्यसन लागले तिन्ही पक्षांचा विचार महाराष्ट्राचा सत्यानाश करत आहे. महाविकास आघाडीच्या सभामंध्ये एक नेता बोलताना इतर तीन लोक वेगळेच बोलतात. अर्धी गर्दी कार्यक्रम सोडून निघून जाते. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असताना 50 टक्के लोक निघून गेले होते.”
पुढे ते म्हणाले, “सत्तेची नशा कधी, कशी आणि कुणाला लागली हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगूच नये. ते राज्यातील तमाम जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या व्यसनापायी ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून 2019 मध्ये ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर ते जाऊन बसले. ठाकरे यांच्याकरिता सत्ता हेच साध्य आहे. त्यांना सत्तेचे व्यसन जडले आहे,” अशी टीका बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये केली.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजपमध्ये येण्याच्या चर्चांबाबतही भाष्य केले आहे. “जर-तरला राजकीय जीवनात अर्थ नाही. आमचा हा महिना प्रवेशाचा आहे. 25 लक्ष प्रवेश करून घेणे हेच आमचे लक्ष्य आहे. बूथवर काम करणाऱ्यांचा प्रवेश सुरू आहे. पक्षामध्ये कोणीही आले तरी स्वागतच आहे. भाजपच्या विचारधारेवर काम करणे मान्य असणाऱ्यांचे स्वागत आहे,” असे बावनकुळे म्हणाले.