मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अपशब्द वापरल्याबद्दल पाच दिवसांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे अंबादास दानवे यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली तसेच जनतेची माफीदेखील मागितली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले त्यांना जनतेनं निलंबित केलं, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. जय संविधान म्हटल्याने भाजपला मिरच्या झोंबल्या अशी टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे.
अंबादास दानवे यांच्यवर केलेली कारवाई एकतर्फी
अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर एकतर्फी कारवाई केली, असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. सुधीर मुनगंटीवार यांनी बहीण-भावाच्या संबंधाबद्दल अपशब्द वापरले त्यावर काय कारवाई करणार? असा खडा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला आहे.
राहुल गांधींची केली पाठराखण
भाजपने राहुल गांधींनी हिंदुत्त्वाचा अपमान केल्याचा आरोप करत देशभरात निदर्शनं सुरू केली आहे. पण, राहुल गांधी असं कोणतीही वेगळं वक्तव्य केलं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही. त्यांनी कुणाचाही अपमान केला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींची पाठराखण करण्यात आली आहे.
राहुल गांधींच्या विरोधात ठराव मांडण्याची मागणी
राहुल गांधींच्या विरोधात ठराव मांडण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी काय चुकीचं म्हटलं आहे का, महादेवाचा फोटो ते दाखवत होते तो त्यांना दाखवू दिला नाही. हेच हिंदूत्व आहे का, जय श्रीरामचा नारा पंतप्रधान सभेत सुद्धा देतात. मग संसदेत इतर कुणी म्हटलं तर हा गुन्हा आहे का. राहुल गांधी यांनी कुणाचाही अपमान केला नाही. आम्ही सुद्धा हिंदुत्व आहे. हिंदुत्त्वाचा कुणी अपमान केला तर सहन करणार नाही यामध्ये राहुल गांधी सुद्धा आहे. भाजप म्हणजे हिंदूत्व नाही. हे मी सुद्धा सांगत होतो तेच राहुल गांधी यांनी सुद्धा सांगितलं. संसदेत काही जण शपथ घेत असताना जय संविधान असा नारा दिला, त्यांना रोखण्यात आलं होतं, त्याचा सुद्धा निषेध केला पाहिजे’ असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.