Udayanraje Bhosale । सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. ही लढत शेवटच्या क्षणांपर्यंत अटीतटीची झाल्याची पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्यानंतर आता उदयनराजे भोसले यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. त्यामुळे येत्या काळात सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर आमचीच पकड राहील, असे सांगत दंड थोपटले आहेत.
आता कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे Udayanraje Bhosale ।
साताऱ्यातील कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शाब्दिक टोलेबाजी केली. आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? कोणीही किती शड्डू ठोका, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिले. आता कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
तसेच यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या समर्थकांना गाफील न राहण्याचा सल्लाही दिला. उदयनराजे आता निवडून आले म्हणजे सगळे झाले, असे समजू नका. तुम्ही निवांत राहिलात तर मेलाच म्हणून समजा, असे उम्हणत कार्यकर्ते आणि समर्थकांना कामाला लागण्याचे आवाहन केले.
चुरशीच्या लढाईत उदयनराजे भोसलेंचा विजय Udayanraje Bhosale ।
दरम्यान, सातारा लोकसभा निवडणुकीच्या लढाईत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा 32,217 मतांनी पराभव केला होता. या विजयानंतर जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला होता. या विजयानंतर गुलालात माखलेल्या उदयनराजे भोसले यांची विजयी मिरवणूक सर्वांच्याच लक्षात राहिली होती. सातारा लोकसभेत पिपाणी या चिन्हाने शशिकांत शिंदे यांचा घात केला होता. पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37,062 मतं मिळाली होती. हीच मतं उदयनराजे भोसले यांच्यादृष्टीने निर्णायक ठरली होती.