चंदीगड : शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर मोठा आरोप केला आहे. भाजपने महाराष्ट्रात जे केले तेच पंजाबमध्ये करण्याचा कट या पक्षाकडून रचला जातो आहे मात्र केंद्र सरकारला आपले मनसुबे पूर्ण करण्यात यश येणार नाही. शिरोमणी अकाली दल एकजुट आहे आणि तो सुखबीर सिंग बादल यांच्यासोबत उभा आहे.
भाजपचे काही पिट्टू अकाली दलात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका हरसिमरत यांनी केली. त्या म्हणाल्या की शिरोमणी अकाली दलाच्या ११७ नेत्यांपैकी केवळ पाच जण सुखबीर बादल यांच्या विरोधात आहेत. ज्या पाच जणांनी विरोध केला आहे ते एकतर भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत किंवा त्या पक्षाच्या संपर्कात आहेत.
या पाच जणांपैकी एक भाजपचा उमेदवार बनून लोकसभेची निवडणूक लढला, दुसऱ्यालाही भाजपने लोकसभा लढायला लावली. तिसऱ्या नेत्याचा भाऊ भाजपसोबत आहे तर चौथा नेता भाजपसोबत जाण्यासाठी आत बाहेर करत असतो. भाजपचे जे चमचे आहेत तेच हे सगळे करत आहेत. भाजपने केवळ पाच लोक फोडले आहेत मात्र उर्वरित सर्व नेते बादल यांच्यासोबत आहेत आणि संपूर्ण पंजाबला याची कल्पना आहे.