नवी दिल्ली – अठराव्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (ता. 24 जून) सुरुवात झाली आहे. 03 जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व खासदारांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
पण या अधिवेशनाची महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या लोकसभेत शेतकरी खासदारांचा आवाज घुमणार आहे. कारण यावेळी सर्वाधिक खासदार हे शेतकरी असून याबाबतची माहिती लोकसभेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आली आहे.
लोकसभेच्या निवडणुका या नुकत्याच पार पडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी 280 खासदार असे आहेत, जे पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले आहेत.
यामध्ये डॉक्टरांपासून, प्राध्यापकांपर्यंत ते अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचाही समावेश आहे. त्यातही सर्वाधिक म्हणजेच तब्बल 179 खासदार हे शेतकरी आहेत. या खासदारांनी त्यांचा व्यवसाय हा शेती असल्याची माहिती लोकसभेत नमूद केली आहे.
सतराव्या लोकसभेच्या तुलनेत शेतकरी खासदारांची संख्या ही 8 टक्क्यांनी कमी झाली आहे. पण तरी देखील 179 खासदार हे शेतकरी आहेत. यामध्ये शेती हा व्यवसाय असलेले खासदार हे भाजपातील असून या पक्षाच्या 240 खासदारांपैकी 79 खासदारांचा शेती हा व्यवसाय आहे.
त्यानंतर काँग्रेसच्या 99 खासदारांपैकी 29 खासदार शेतकरी आहेत. तर समाजवादी पक्षाच्या 37 खासदारांपैकी 23 खासदार, द्रमुकचे 22 पैकी 09 आणि तृणमूल काँग्रेसचे 29 पैकी 2 खासदार हे शेतकरी आहेत.
अठराव्या लोकसभेत 115 खासदारांनी ते सामाजिक कार्यकर्ते असल्याची माहिती नमूद केली आहे. मागील लोकसभेच्या तुलनेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या संख्येत 13.13 टक्क्यांनी घट झाली आहे, ज्यामध्ये 192 खासदार सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते.
त्याशिवाय, 100 खासदार हे उद्योजक असून 39 वकील खासदार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, 70 खासदार असे आहेत ज्यांनी राजकारण हा आपला व्यवसाय असल्याची माहिती नमूद केली आहे. तसेच, 28 खासदार हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. मात्र, हे सर्व आकडे गेल्यावेळच्या आकड्यांपेक्षा कमी आहे.