Raksha Khadse । भाजप प्रणित एनडीएने बहुमत मिळवलंय त्यानंतर आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राज्यातील अनेक खासदारांना भाजपा पक्षनेतृत्वाने फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महिला खासदार रक्षा खडसे यांना फोन आल्याची चर्चा आहे. यावर खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
विजयाचं आणि या यशाचं श्रेय जनतेला Raksha Khadse ।
रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी खडसे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून फोन आल्याची चर्चा आहे. यावर खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी, “लोकसभा निवडणुकीतील विजयाचं आणि या यशाचं श्रेय जनतेला द्यावं लागेल. कारण जनतेमुळेच मी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहे. यासह आमच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानते, त्यांच्या योगदानामुळे मी निवडून आले आहे.”असे म्हटले आहे.
दरम्यान, यावेळी खासदार खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला की कोणत्या मंत्रिपदाची तुम्हाला जबाबदारी मिळू शकते किंवा निवडणुकीचा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक होता का? यावर रक्षा खडसे म्हणाल्या, “हो! नक्कीच निवडणुकीत आव्हानं होती. परंतु, जनता माझ्याबरोबर ठामपणे उभी राहिली. त्यामुळे मला चांगलं यश मिळालं. तसेच मी तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे, हे (मंत्रिपद) त्याचंच फळ आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर पक्षाने माझ्यावर इतका मोठा विश्वास दाखवला त्याबद्दल मी पक्षाची आभारी आहे.”
“आता पुढचं पुढे बघू…” Raksha Khadse ।
खासदार खडसे यांना यावेळी विचारण्यात आलं की तुम्हाला पक्ष नेतृत्वाकडून आता काय अपेक्षा आहेत? त्यावर रक्षा खडसे यांनी उत्तर देणं टाळलं. त्या म्हणाल्या, “आता पुढचं पुढे बघू… पुढे काय होतंय ते ठरवू… मात्र मतदारसंघात कोणकोणती कामं करायची आहेत हे मात्र मी ठरवलं आहे.”