महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यावर पक्ष, नेते आणि कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. त्यामुळे एकेका विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता गती घेईल. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील राजकारणात चुरस आहे तशीच चुरस सातारा जिल्ह्यातील राजकारणात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यामधील घटक पक्ष एकत्रित लढणार की पुन्हा प्रत्येक जण स्वबळाची भाषा करणार हे ठरण्यासाठी अजून खूप पाणी जायचे आहे. अशीच स्थिती सातारा जिल्ह्यातही असली तरी या सर्व घटक पक्षांच्या काही जागा सध्या तरी निश्चित मानल्या जात आहेत. मात्र, राजकारणात होणाऱ्या बदलांची अजून प्रतीक्षाच असल्यामुळे सध्या सावध हालचाली सुरु झाल्या आहेत…
श्रीकांत कात्रे
लोकसभेच्या निवडणुकीचा माहोल नुकताच संपला आहे. जय पराजयाची विश्लेषणे सध्या सुरु आहेत. त्याच वातावरणात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. खरं तर आगामी काळ निवडणुकीचाच असणार आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या राजकारणात महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. त्यात महाराष्ट्रातील राजकारणाचा विचका झालेला असताना या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जवळजवळ वर्षभर आचारसंहिता असण्याच्या काळात लोकांच्या प्रश्नांचे काय होणार याचे उत्तर मिळणेही अवघड होणार आहे.
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यामधील प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व वाढविण्यासाठी झुंज देणार आहेत. त्याशिवाय बहुजन वंचित आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे काही इतर पक्षही या निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठ दहा पक्षांशिवाय अपक्ष अशा बहुरंगी लढती यावेळी होण्याचीच दाट शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नसेल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहिली तर कागदोपत्री तरी विधानसभेच्या आठ मतदारसंघांमध्ये फलटण, सातारा, कोरेगाव, माण, कराड दक्षिण या मतदारसंघात महायुतीतील पक्षाची स्थिती चांगली आहे.
वाई, कराड उत्तर आणि पाटण या तीन मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला निसटती आघाडी मिळाली आहे. म्हणजेच आठही मतदारसंघांमध्ये महायुतीतील पक्षांनी चांगली ताकद लावली तर जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र पूर्णपणे बदलून जाऊ शकते. कारण कराड उत्तरमध्ये आघाडीला कमी मताधिक्य मिळाल्याने आमदार बाळासाहेब पाटील यांना धोक्याची घंटा असल्याचे विश्लेषण होत आहे. तर पाटणमध्येही आघाडीला मताधिक्य मिळाल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांना ही पिछाडी जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच त्यांनी मंत्रिपदावरून पायउतार होण्याबाबतची खंत व्यक्त करुन दाखवली होती. अर्थातच लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका यात खूप मोठा फरक असतो. दोन्ही निवडणुकांचे कंगोरे वेगवेगळे असतात. त्यामुळे लोकसभेतील आकडेवारीप्रमाणेच विधानसभेलाही घडेल असे समीकरण मांडणेही योग्य नाही. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नेत्यांच्या ताकदीवर, संपर्कावर, प्रतिमेवर आणि मुख्य म्हणजे काम करण्याच्या पद्धतीवर बरेच काही अवलंबून असते. लोकसभा निवडणुकीला देशपातळीवरील राजकारणाचे रंग असतात. विधानसभेला स्थानिक धागेदोरे महत्त्वाचे ठरतात.
तरीही लोकसभेतील आकडेवारीनुसार पुढे जायचे म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्ष हे दोन्ही पक्ष विधानसभेसाठी कसून तयारी करुन लढत देतील अशी स्थिती आहे. महायुतीत सातारा व माण या दोन मतदारसंघात अनुक्रमे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांची भाजपची उमेदवारी निश्चित मानली जाते. शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांचेही प्रयत्न जोरदार असतील. त्यात महेश शिंदे (कोरेगाव) आणि शंभूराज देसाई (पाटण) हे दोन विद्यमान आमदार असल्याने शिवसेना शिंदे गटाचा आणि मकरंद पाटील (वाई) व दीपक चव्हाण (फलटण) हे दोन विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) असल्याने या चार मतदारसंघातील त्या त्या पक्षाचे दावे निश्चित असणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये कराड उत्तर व कराड दक्षिण या दोन्ही मतदारसंघावरील अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा दावा कायम असणार आहे. या स्थितीत प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखताना कोणकोणते डावपेच खेळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार विधासभेआहे.