भाटघर, (वार्ताहर) – भाटघर परिसरात आवश्यक पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरणीसह भात तरव्यांची उगवण समाधानकारक झाली असून थोड्याच दिवसातच भात तरवे लावणीसाठी योग्य असणार आहे. शेतकर्यांनी भात खाचराची साफ सफाई करून शेतातील गवताची विल्हेवाट लावून भात खाचरे लावणी योग्य करण्याच्या मशागतीसाठी लगबग सुरू आहे.
सद्यस्थितीत भात तरवे, कडधान्ये पिके यासाठी पोषक अनुकूल असून त्यामुळे कडधान्य पिकासह भात तरवे जोमाने तरारली आहेत. कडधान्ये पिकांमध्ये प्रामुख्याने भुईमूग, सोयाबीन, घेवडा, चवळी, मूग, उडीद, तीळ, पावटा यांचा समावेश आहे. भात तरव्यांमध्ये प्रामुख्याने महाबीजचे इंद्रायणी,
कर्नाटकी इंद्रायणी, तसेच इतरही कंपन्यांचे इंद्रायणी, रत्नागिरी चोवीस, कोळंबा, बासमती, कोलम, आंबेमोहोर अशा अनेक नव नवीन भात वाणांचा समावेश आहे. या पीकांची, तरव्यांची उगवण चांगली झाल्याने या पिकांची खुरपणी, कोळपणी करण्यात या परिसरातील शेतकरी व्यस्त आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात पिकांसाठी आवश्यक ऊन, पाऊस हे दोन्ही समाधानकारक असल्याने या भागातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.