पिंपरी,(प्रतिनिधी) – अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी आणि उद्योगांबाबत असलेले धोरण योग्य आहे. त्याचा उद्योगांना फायदाही होईल, परंतु ते धोरण अधिकार्यांनी राबविले पाहिजे. गेल्या काही वर्षांत सरकारचा अधिकार्यांवर अंकुश असल्याचे दिसून येत नाही. योजना जाहीर होतात परंतु अंमलात येत नाहीत.
पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले की, राज्य सरकारच्या वतीने मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये उद्योगांच्या वाढीसाठी आणि नवीन उद्योगांसाठी अनेक घोषणा आणि तरतुदी करण्यात आल्या आहेत.
उदाहरणार्थ मुख्यमंत्री रोजगार योजना उद्योगांसाठी चांगली आहे. परंतु बँका पैसे द्यायला तयारच होत नाहीत. ज्याप्रमाणे सरकारने शेतकर्यांच्या कर्जासाठी भूमिका घेतली आहे तशी भूमिका उद्योगांना मिळणार्या कर्जासाठी देखील घ्यायला हवी. एक खिडकी योजना नसल्याने फाइल अनेक टेबलवरुन फिरते. यामुळे अनेक उद्योग सुरूच होऊ शकत नाहीत.
राज्यात मोठे उद्योग यायला हवेत
राज्यात मोठे उद्योग, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रकल्प येत नाहीत. तसेच विदेशी गुंतवणुकीचा ओघही कमी होत आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बडे उद्योग यायला हवेत, तरच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळू शकेल.