पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जपावी, आपले संस्कार आणि नीतिमूल्ये यांचे कायम जतन करावे. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. त्यापेक्षा निसर्गप्रेमी व्हावे. आजकाल विद्यार्थीदशेतच अनेक मुले व्यसनाधीन होत आहेत.
त्यावर शिक्षक, पालक आणि समाजातील प्रत्येक घटकाने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे मत आर.एम.डी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारिवाल यांनी व्यक्त केले.
श्री रसिकलाल मा. धारिवाल इंग्रजी शाळा कोंढवा येथे इयत्ता दहावीत गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या तसेच बारावीत विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरण शोभाताई आर. धारिवाल यांच्या हस्ते झाले. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आर.एम.डी. इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा क्रम कायम ठेवला आहे.
विद्यार्थ्यांनी जगातील नवीन नवीन तंत्रज्ञान शिकावे, आत्मसात करावे, अशी अपेक्षा यावेळी शोभाताई धारिवाल यांनी व्यक्त केली. आर.एम.डी. फाउंडेशनद्वारा या शाळेत २८ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या स्मार्ट पॅनेल बोर्ड तसेच आधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन शोभाताईंच्या हस्ते करण्यात आले.
२००१ मध्ये एका छोट्याशा खोलीत दोन विद्यार्थ्यांना घेऊन सुरू केलेल्या या शाळेत सध्या नर्सरी ते बारावीपर्यंत विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील १,६५० विद्यार्थी शिकत आहेत. एका रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे, असे शोभाताई धारिवाल म्हणाल्या.
आर.एम.डी. फाउंडेशनद्वारा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पक्ष्यांच्या खाद्याचे घरटे भेट म्हणून देण्यात आले. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण उपस्थितांच्या हस्ते पार पडले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त पोपटशेठ ओस्तवाल, ललित ओस्तवाल, संस्थेचे विश्वस्त, मुख्याध्यापिका स्वाती बहुलेकर, उपमुख्याध्यापिका संध्या नाडगौडा, ज्ञानेश्वर देशमुख, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.