- आई-वडिलांचा आरोप
- कारवाईला कंटाळून मुलाने घेतला गळफास
पिंपरी – “करोना’च्या संकटकाळात पोट भरणे मुश्किल झाले आहे, तरीही त्याची जगण्याची आणि कुटुंब जगविण्याची धडपड सुरुच होती. त्यातच नियमांची बंधने. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी त्याची भाजीची हातगाडी उचलून नेली. त्यानंतर सोमवारी पुन्हा बळजबरीने वजनकाटा नेला. अतिक्रमण विरोधी पथकाच्या जाणिवपूर्वक आणि सातत्यापूर्ण अन्यायकारक कारवाईला कंटाळूनच माझ्या अल्पवयीन मुलाने सोमवारी (दि. 12) आत्महत्या केली, असा खळबळजनक आरोप मयत मुलाच्या आईवडीलांनी केला आहे.
योगेश वैजनाथ म्हेत्रे (वय 17, रा. घरकुल, चिखली) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. योगेश याचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मोठा भाऊ रांजणगाव येथील एका कंपनीत कामाला आहे. घरासाठी त्यांनी कर्ज घेतलेले असून ते फेडण्यासाठी योगेश हा आपल्या आईसोबत भाजी विक्रीचा व्यवसाय करीत होता. पहाटे उठून भाजी खरेदी करून आणायची आणि घरकुल परिसरात ती विकायची, असा त्याचा व त्याच्या आईचा दिनक्रम होता. लॉकडाऊन झाल्यापासून भाऊ आणि वडील घरीच होते. त्यामुळे योगेश आणि त्याच्या आईवर कुटुंबाची जबाबदारी आली.
घरकुलमध्ये काही जणांनी भाजीपाला विक्रीचा पास काढला होता. मात्र ते योगेशला माहिती नव्हते, पास नसल्याने अतिक्रमण विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी योगश याची भाजीची गाडी उचलून नेली. तरीदेखील पोटाची खळगी भरण्यासाठी तो भाजी आणून घरकुल परिसरात विक्री करीत होता. सोमवारी (दि. 11) देखील तो भाजी विक्री करीत असताना अतिक्रमण विरोधी पथक आले. यामुळे त्याने वजनकाटा घरी नेऊन ठेवला व भाजी विकणे बंद केले. यानंतरही अतिक्रमण विरोधी पथक त्याचा भाजीपाला नेऊ लागले.
तेव्हा “साहेब दोनच दिवसांपूर्वी हातागाडी नेली. आता भाजीपाला नेल्यावर आम्ही जगायचं कस’, अशी विनवणी त्याने केली. मात्र पथकाने जराही ऐकले नाही. तुझा वजनकाटा आणून दे, नाहीतर भाजीपाला घेऊन जाणार, अशी भूमिका अतिक्रमण विरोधी पथकाने घेतली. यामुळे नाईलाजास्तव योगेशने वजनकाटा आणून दिला.
वजनकाट्याशिवाय भाजीपाला कसा विकणार, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. आपल्यावरच अतिक्रमण विरोधी पथक जाणीवपूर्वक का कारवाई करत आहे, असा प्रश्न त्यास सतावत होता. आपल्यालाही भाजीपाला विक्रीचा पास आण, असे योगेशने आई व बहिणीला सांगून घराबाहेर पाठविले. मोठा भाऊ बाहेरच्या घरात झोपला होता. त्यावेळी योगेश याने नैराश्येतून राहत्या घरी सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे योगेश याचे वडील वैजनाथ यांनी दै. “प्रभात’शी बोलताना सांगितले.
शहरभर फिरणाऱ्या, वशिलेबाजी करणाऱ्या, राजकीय वरदहस्त असणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करताना दुजाभावाची भूमिका घेणाऱ्या पालिका प्रशासनाने गोरगरीबांवर बळजबरी करत केलेली कारवाई एका अल्पवयीन मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची चर्चा चिखली परिसरात सुरू आहे.
“सध्या करोनाची साथ असल्याने वरिष्ठांच्या सूचनांनुसार पोलिसांना सोबत घेऊन अतिक्रमण कारवाई केली आहे. यामध्ये आमची कोणतीही चूक नाही. चुकीच्या पद्धतीने विक्री सुरू असल्यास तसेच पास न काढणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे.’
राजेंद्र राणे, कार्यकारी अभियंता