लोणीकंद – लोकशाही सदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते.
शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र शिकवलं जातं. पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिकशास्त्र शिकवण्याचा यशस्वी प्रयोग लोणीकंद येथील होली स्पिरिट कॉन्व्हेंट स्कुलन केला आहे.
विशेष म्हणजे स्कुल च्या निवडणुकीतून आपले प्रतिनिधी निवडले आहेत. नुकतेच ही निवडणूक प्रक्रिया पार पडून नवनियुक्त प्रतिनिधींचा शपथविधी सोहळा शाळेत पार पडला.
यावेळी गजानन जाधव पोलीस उपनिरीक्षक वाहतूक विभाग, मुख्याध्यापिका लिली सिस्टर, उप मुख्याध्यापिका मारिया तेरेस, संचालिका प्रसन्ना सिस्टर, सर्व शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये राजकारणाबाबत निर्माण झालेली उत्सुकता व विद्यार्थ्यांना लोकशाहीचा अर्थ समजून मतदान हक्काचे प्रबोधन व्हावे याकरिता शाळेत निवडणूक प्रक्रिया, मतमोजणी व शपथविधीचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य व समूह गायनाचे सादरीकरण करत शालेय निवडणूक कमिटीच्या सर्व सभासदांनी नियोजन बद्ध पद्धतीने अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात विद्यार्थी व शिक्षकांचे पालकांमधून कौतुक होत आहे.
शिक्षक झाले मतदान अधिकारी
शिक्षकांनी मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली. मतदार यादी म्हणून वर्गनिहाय याद्या केल्या. त्यावर मतदान केल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली. मतदान केल्यावर विद्यार्थ्यांच्या बोटास शाई लावण्यात आली.
इयत्ता सहावी ते दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. शाळेच्या वतीने विजयी उमेदवाराचा सत्कार करण्यात आला. निवडणुकीचे महत्त्व मुलांना पटवून सांगण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी निवडणुकीसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेचे धडे
विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी हि निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी करणे, माघार घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष मतदान अशा सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आल्या.
या निवडणुकीत २६ जागांसाठी ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळी विद्यालयातील ९५० विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
विद्यार्थ्यांनी निवडले प्रतिनिधी
लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्या समस्या सुटतील याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.
बुधवार (दि.१२) सकाळी 11 ते 2 वाजता मतदान घेण्यात आले तर शनिवार (दि १५) पाच वाजता मतमोजणी करून मंगळवार (दि.१८) निकाल जाहीर करण्यात आला.
विद्यार्थी प्रतिनिधी मध्ये अथर्व प्रशांत वाघमारे निवडून आला तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून वैभवी संतोष साबळे ही निवडून आली. सध्या या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेची सर्वत्रच चर्चा होत आहे.