मंचर, (प्रतिनिधी) – महाळूंगे पडवळ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतून जाणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या कालव्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. हा पूल जलसंपदा विभागाने तात्काळ दुरुस्त करावा, अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा महाळुंगे पडवळ ग्रामस्थांनी दिला आहे.
महाळुंगे पडवळ येथे महाळुंगे पडवळ ते गिरवली कालव्यावरून हा पूल आहे. या पुलाचे कठडे तुटले आहेत. तसेच पुलाच्या खालील बाजूचा असलेला पिलर याला तडे गेले असून पिलरचे दगडी ढासळले आहेत. त्यामुळे हा पूल कधीही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी टाकेवाडी येथे कालव्याची घटना झाली होती.
त्याच पद्धतीने येथे ही घटना घडण्याची शक्यता आहे. या पुलावरून ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी येता करत असतात तसेच शेतीचा माल नेला जात असतो. याबाबत जलसंपदा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही जलसंपदा विभाग या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
भविष्यात हा पूल कोसळला व या ठिकाणी दुर्घटना घडून जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जलसंपदा विभाग जबाबदार राहील, असेही ग्रामस्थांनी सांगितले आहे.
पुलाची दयनीय अवस्था पाहता तालुक्याचे आमदार, खासदार यांनीही याकडे लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात व जलसंपदा विभागाने कालव्यावरील पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.