BCCI Jay Shah on T20 Captain, WTC and ICC Champion Trophy 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी टीम इंडियाच्या पुढील टी-20 कर्णधाराबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे वरिष्ठ खेळाडू 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा भाग असतील याचीही त्याने पुष्टी केली.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोमवारी सांगितले की, पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि भारत पात्र ठरल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील संघात वरिष्ठ खेळाडू असतील, तर पुढील टी-20 कर्णधार निवडकर्त्यांद्वारे निश्चित केला जाईल. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना जय शाह यांनी टी-20 विश्वचषकात जेतेपद पटकावणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीचे देखील कौतुक केले.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या निवृत्तीबद्दल बोलताना जय शाह म्हणाले, “या तिन्ही महान खेळाडूंच्या निवृत्तीमुळे बदलाला सुरुवात झाली आहे. हा संघ ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे हे आमचे लक्ष्य आहे. जवळपास हाच संघ त्या स्पर्धेत खेळणार आहे. वरिष्ठ देखील संघात असतील, असेही त्यांनी सांगितले.”
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताकडून एकदिवसीय सामने खेळत राहतील, हे जय शाह यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी मार्च 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत जय शाहने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्याच्या शक्यतेवर जय शाह म्हणाले, “कर्णधाराबाबत निर्णय ही निवड समिती करेल आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही घोषणा करू.” यावरून हे स्पष्ट झाले आहे की, हार्दिकच कर्णधार होणार हे अद्याप ठरलेले नाही.