मंचर, (प्रतिनिधी) – शेतकर्यांना शेती पिकासाठी भांडवल म्हणून बँकांमार्फत कर्ज घ्यायचे आहे; परंतु पीक पाहणी अॅप बंद असल्याने शेतकर्यांची ससेहोलपट सुरू आहे. तलाठी पीक पाहणी करून देतात; परंतु त्यांनाही पैशाची मोठी अपेक्षा असल्याने शेतकर्यांची सर्वत्र आर्थिक पिळवणूक केली जात आहे.
सध्या पावसाळा सुरू असून विविध शेती पिकांसाठी बी, बियाणे, खते, औषधे खरेदी करण्यासाठी शेतकरी कर्ज घेतात; मात्र पीक कर्ज घेण्यासाठी जमिनीचे शासकीय मूल्यांकन घेणे गरजेचे असते. हा मूल्यांकन दाखला दुय्यम निबंध कार्यालयातून मिळतो; परंतु सातबारा उतार्यावर चालू वर्षाची पीक पाहणी अपडेट नसल्याने या कार्यालयातून मूल्यांकन दाखला मिळत नाही.
तसेच खरेदीखत किंवा इतर हस्तांतर व्यवहारासाठी जमिनीचे मूल्यांकनावर स्टॅम्प ड्युटी भरणे गरजेचे असते; परंतु पीक पाहणी चालू वर्षी नोंद नसल्याने दुय्यम निबंध कार्यालयात उसाचे मूल्यांकन गृहीत धरून त्यावर स्टॅम्प ड्युटी अवास्तव आकारली जाते.
शेतकरी पीक पाहणी अपडेट करण्यासाठी मोबाईलवर प्रयत्न करतात; परंतु अॅपच बंद असल्याचे शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकदा तलाठ्याच्या माध्यमातून टेबलाखालून पैसे देऊन पीक पाहणी लिहून घ्यावी लागत आहे.
तलाठ्यांना आदेश द्यावेत
पीक पाहणी अपडेट नसेल तर शेतकर्यांचे खरेदी खत होत नाही. त्यांना कर्ज काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अनेकदा शेतकर्यांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे तलाठी यांना पिक पाहणी अपडेट करण्याचे आदेश द्यावेत.
महसूल विभागाने तलाठी भाऊसाहेबाना पिक पाहणीचा दाखला देणे बंधनकारक करावे. तसेच वारंवार बंद पडत असलेले अॅप सुरळीत सुरू करावे. अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
मोबाईलला अनेक ठिकाणी रेंज नाही. त्यामुळे डोंगरदर्यात शेती असणार्या शेतकर्यांना मात्र पीक पाहणी अॅप रेंज नसल्यामुळे चालत नाही. अनेक शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल सुद्धा नाही.
त्यांनी कशी पीक पाहणी करायची. असा सवालही अनेक शेतकर्यांनी उपस्थित केला आहे. त्यासाठी महसूल विभागाने तलाठी भाऊसाहेबाना पिक पाहणीचा दाखला देणे बंधनकारक करावे. -अॅड. आशिष काजळे, मंचर