T20 World Cup 2024 (IND vs ENG Semi Final ) :- टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील सुपर ८ फेरीचा थरार आता संपला असून आता उपांत्य फेरीचे वेध लागले आहेत. उपांत्य फेरीतील पहिला सामना दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आणि दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. २७ जूनला हे दोन्ही सामने पार पडणार आहेत. दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर एक दिवस राखीव ठेवला आहे. मात्र भारत इंग्लंड सामन्यात असा राखीव दिवस ठेवला नाही.
सामना संपवण्यासाठी अतिरिक्त तास मिळणार आहेत. पण पाऊस पडतच राहिला तर रद्द करण्याशिवाय पर्याय नाही. अक्युवेदरनुसार, २७ जून रोजी गयानामध्ये ८८ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सामना सुरु होईल. तेव्हा भारतात रात्रीचे ८ वाजलेले असतील. या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर अंतिम फेरीचे तिकीट कोणाला मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला.
भारत आणि इंग्लंड सामन्यात पाऊस पडला तर हा सामना संपवण्यासाठी सामन्याव्यतिरिक्त २५० अतिरिक्त मिनिटे देण्यात आली आहेत. म्हणजेच ४ तास आणि १० मिनिटे अतिरिक्त मिळतील. यातच हा सामना संपवायचा आहे. जर पाऊस पडतच राहिला तर मात्र हा सामना रद्द करावा लागेल. दुसरे हा सामना एकही चेंडू न खेळता रद्द झाला तर मग भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. कारण सुपर ८ फेरीत भारताने तीनही सामने जिंकून अव्वल स्थान गाठले आहे. त्यामुळे अंतिम फेरीसाठी भारताला पसंती मिळेल.
दुसरीकडे, अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यांवरही पावसाचे सावट आहे. दोन्ही उपांत्यफेरीचे सामने खेळवले जातील असा सर्वांचा प्रयत्न असेल परंतु जर स्थिती खूपच खराब झाली तर दोन्ही सामन्यांमध्ये जो संघ त्यांच्या गटात अव्वल असेल तो अंतिम फेरीत जाईल.
गेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडने भारताला १० गडी राखून पराभूत केले होते. आता पुन्हा एकदा इंग्लंडने ट्वीट करून भारताला ती आठवण करून दिली आहे. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या जोडीकडे आहे. कारण विजयानंतर या जोडीचे एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. राहुल द्रविडने भारतीय संघाची सूत्र हाती घेतली तेव्हा पहिल्यांदा टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेला सामोरं गेला होता. तसेच कर्णधार म्हणून रोहित शर्माची वर्णी लागली होती.