T20 World Cup 2024 (IND vs ENG, Semifinal Match 2) : – भारतीय संघाने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारत उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. आता आज रात्री 8.00 वाजता (२७ जून) खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील. उपांत्य फेरीत जाण्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला आणि आता इंग्लंडचा जुना हिशोब चुकता करण्याची वेळ आहे.
दरम्यान, 2023 च्या एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आता भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील सुपर-8 फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून त्या पराभवाचा बदला घेतला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान पूर्णपणे संपुष्टात आले. आता इंग्लंडचा बदला घेण्याची वेळ आहे.
याआधी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वकरंडकात इंग्लंड संघाने भारताचा उपांत्य फेरीत पराभव केला होता. योगायोगाने या विश्वचषकातही भारताला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे. गेल्या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. आता, यावेळी भारतीय संघ याच मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
गयाना येथे रंगणार लढत…
यावेळी 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीचा दुसरा सामना हा भारत आणि इंग्लंड यांच्यात 27 जून रोजी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामना सुरू होईल. तर, स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. आता या उपांत्य फेरीत कोण जिंकणार आणि अंतिम फेरीत धडक मारणार? याची सर्व क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे.
गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियममध्ये भारताचा रेकॉर्ड कसा आहे?
सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावरील टीम इंडियाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, गयानामध्ये भारताने 3 सामने खेळले आहेत त्यापैकी 2 जिंकले तर फक्त एकामध्ये पराभव झाला आहे. इंग्लंडने या मैदानावर 2 टी-20 सामने खेळले, एकात त्यांना वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला.
गयाना नॅशनल स्टेडियम टी-20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड आकडेवारी
एकूण सामने – 18
प्रथम फलंदाजी करताना विजय – 6
नंतर फलंदाजी करताना विजय – 9
अनिर्णायक- 3
सर्वोच्च धावसंख्या- 191/5 (इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज- 2010)
सर्वात कमी धावसंख्या- 39 (युगांडा वि. वेस्ट इंडीज- 2024)
कोहलीला सुर गवसणार का?
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताने सलग विजयांची विक्रमी वाटचाल केली असली तरीही त्यात स्टार फलंदाज विराट कोहलीचे योगदान दिसलेच नाही. तो अनेकदा तर खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तरी त्याची बॅट कमाल दाखवेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.