T20 World Cup 2024 (Super 8, IND vs AFG Score Update) : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर एटचा सामना केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळला जात आहे. भारतीय संघाचा सुपर-8मधला हा पहिलाच सामना आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक आणि हार्दिक पांड्यासोबतची भागीदारी यांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर एट टप्प्यातील सामन्यात 20 षटकांत आठ गडी गमावून 181 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावा कराव्या लागतील.
Innings break!
A blazing counter-attacking fifty from @surya_14kumar powers #TeamIndia to 181/8 👏👏
Over to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/xtWkPFabs5#T20WorldCup | #AFGvIND pic.twitter.com/yvuQbiVbN2
— BCCI (@BCCI) June 20, 2024
अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर एट टप्प्यातील सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात चांगली झाली नाही कारण कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर झगडताना दिसला. त्याला 13 चेंडूत केवळ 8 धावा करता आल्या. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्यात 43 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. पॉवर प्ले संपेपर्यंत भारताने 47 धावा केल्या होत्या, पण पुढच्याच षटकात रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करताना ऋषभ पंतला पायचीत (एलबीडब्ल्यू )घोषित करण्यात आले. त्याने 20 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहलीही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात राशिद खानच्या हाती झेलबाद झाला. त्याने 24 चेंडूत 24 धावा केल्या. शिवम दुबे सतत मिळत असलेल्या संधींचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला आणि यावेळीही तो केवळ 10 धावांवर बाद झाला.
अकराव्या षटकापर्यंत टीम इंडियाची धावसंख्या 4 गडी बाद 90 धावा अशी होती. येथून, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने 69 धावांची शानदार भागीदारी केली आणि पुढील 4 षटकात 36 धावा जोडल्या. सूर्यकुमारने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. ज्याने 28 चेंडूत 5 चौकार अन् 3 षटकारासह 53 धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्यापाठोपाठ हार्दिक पांड्याही लगेचच माघारी परतला. त्याने 24 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारासह 32 धावांचे योगदान दिले. रवींद्र जडेजाचा खराब फॉर्म कायम असून त्याने केवळ 7 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये अक्षर पटेलने 6 चेंडूत 12 धावांची छोटी खेळी खेळली आणि भारताला 180 धावांच्या पुढे नेले.
शेवटच्या 5 षटकात 55 धावा…
सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी आपल्या विकेट्स एकापोठापाठ गमावल्या असल्या तरी त्याचा भारताच्या धावगतीवर परिणाम झाला नाही. टीम इंडियाने शेवटच्या 5 षटकात एकूण 55 धावा केल्या. शेवटच्या 5 पैकी तीन ओव्हर अशा होत्या ज्यात 10 पेक्षा जास्त धावा झाल्या. अफगाणिस्ताननेही शेवटच्या 5 षटकांमध्ये पुनरागमन केले, कारण या षटकांमध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या विकेट पडल्या नसत्या तर भारताला 200 धावांपर्यंत मजल मारता आली असती.
कर्णधार रशीदची शानदार गोलंदाजी…
अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकी आणि कर्णधार राशिद खान यांनी प्रत्येकी तीन बळी घेत भारतीय फलंदाजांना दडपणाखाली ठेवले. राशिद 4 षटकात 26 धावा तर फारुकीने 4 षटकात 33 धावा दिल्या. तर नवीन-उल-हक याने 4 षटकात 40 धावा देत 1 बळी घेतला.