T20 World Cup 2024 (IND vs SA Final,Toss Update) :आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या विजेतेपदाचा सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.
भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना तिसऱ्यांदा खेळणार आहे. यापूर्वी 2007 आणि 2014 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताने 2007 मध्ये जेतेपद पटकावले होते, तर 2014 मध्ये त्याचे विजेतेपद हुकले होते. तर दुसरीकडे आफ्रिकन संघ पहिल्यादाच टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना खेळणार आहे. तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (India won the toss and Elected to Bat) त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला प्रथम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावे लागेल.
दोन्ही संघांचा फायनलपर्यंतचा प्रवास….
टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. तर सुपर 8 फेरीमध्ये टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम राखली. तर उपांत्य फेरीत इंग्लंडचा धुव्वा उडवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका यांचा संघसुध्दा टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अजिंक्य आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील 4 आणि सुपर 8 मधील 3 सामने जिंकले. तसेच उपांत्य फेरीत अफगाणिस्तानवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
दोन्ही संघाचे हेड-टू-हेड रिकाॅर्ड…
टीम इंडियासाठी या टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक 248 धावा केल्या आहेत. तर अर्शदीप सिंहने सर्वाधिक 15 विकेट्स घेतल्या आहेत. दोघांनी ही कामगिरी गेल्या 7 सामन्यांमध्ये केली आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 26 टी-20 सामने झाले आहेत. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 26 पैकी 14 सामन्यात विजय तर दक्षिण आफ्रिकेला 11 सामन्यात यश मिळवता आलं आहे.
आयसीसी टी-20 वर्ल्डकपबदल बोलायचे झाले तर या स्पर्धेत उभयसंघात एकूण 6 वेळा आमना-सामना झालाय. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे तर दक्षिण आफ्रिकेला फक्त 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे.