T20 World Cup 2024 (IND vs SA Final, Score Update) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी टी-20 विश्वचषक 2024 चा विजेतेपदाचा सामना खेळला गेला. या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित होते. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. विजतेपदाच्या लढतीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली आणि यामध्ये टीम इंडियाने बाजी मारत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला आहे. भारत आता T20 क्रिकेटचा नवा चॅम्पियन बनला आहे.
भारताने 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत आठ गडी गमावून 169 धावा करता आल्या. आफ्रिकेकङून फलंदाजीत हेनरिक क्लासेनने 27 चेंडूत सर्वाधिक 52 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने 21 चेंडूत 31 तर मिलरने 17 चेंडूत 21 धावा केल्या.
या विजयासह भारताचा 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला आहे. याआधी 2011 मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. 177 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने एकवेळ 15 षटकांत 4 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. येथून त्यांचा विजय निश्चित वाटत होता, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. रोहित आणि विराटने पहिल्यांदाच एकत्र खेळताना विश्वचषक जिंकला आहे.
जसप्रीत बुमराह 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. या विश्वचषकात बुमराहने आठ सामन्यांत 15 बळी घेतले आणि अनेक वेळा भारताला हरवलेले सामने जिंकून दिले.विराट कोहलीला सामनावीराचा किताबही देण्यात आला.अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहने 4 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेला 18 चेंडूत 22 धावांची गरज असताना बुमराहने 18व्या षटकात केवळ दोन धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. येथून भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता.अर्शदीप सिंगने 19व्या षटकात 4 धावा दिल्या, तर हार्दिकने शेवटच्या षटकात केवळ 8 धावा देत टीम इंडियाला 7 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.भारताच्या विजयात सूर्यकुमार यादवचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने सीमारेषेवर डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेतला. हा झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या विजयाचे सर्वात मोठे हिरो ठरले. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी 6 पेक्षा कमी इकॉनॉमीवर धावा दिल्या आणि 2-2 विकेट घेतल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने 20 धावांत 3 बळी घेतले.
दरम्यान, अंतिम सामन्यात टाॅस जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्मानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहलीच्या अर्धशतकी आणि अक्षर पटेलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकात 7 विकेट गमावत 176 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. याआधी अक्षर पटेलने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. या अष्टपैलू खेळाडूने धावबाद होण्यापूर्वी 31 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले. शिवम दुबेने शेवटच्या षटकांमध्ये 16 चेंडूत 27 धावा जोडल्या.
Innings Break! #TeamIndia post 1⃣7⃣6⃣/7⃣ on the board.
7⃣6⃣ for @imVkohli
4⃣7⃣ for @akshar2026
2⃣7⃣ for @IamShivamDubeOver to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/c2CcFqY7Pa#T20WorldCup | #SAvIND pic.twitter.com/Xf3aNtgAJO
— BCCI (@BCCI) June 29, 2024
वास्तविक, नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. विराट कोहली आणि रोहित शर्माने पहिल्या षटकात 15 धावा केल्या, मात्र त्यानंतर विकेट्स पडण्याची मालिका सातत्याने सुरू झाली. रोहित शर्माशिवाय ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यात उत्कृष्ट भागीदारी झाली.
रोहित शर्मा 9 चेंडूत 5 धावा करून बाद झाला तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत शून्यावरच माघारी परतला. या दोन्ही फलंदाजांना केशव महाराजने बाद केले. सूर्यकुमार यादवही 4 चेंडूत 3 धावा करून कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यावेळी भारताची 4.3 षटकात 3 बाद 34 अशी बिकट स्थिती झाली होती मात्र यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यात 62 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. अक्षर पटेल धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला, पण विराट कोहलीने एक बाजू रोखून धरली व संघाची धावसंख्या 150 पार नेली. या सामन्यात किंग कोहलीने 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 2024 च्या टी-20 विश्वचषकातील त्याच्या बॅटमधून आलेले हे पहिले अर्धशतक ठरले.
डावाच्या 19व्या षटकात संघाची धावसंख्या 163 असताना मार्को यानसेनच्या चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला. कोहलीने दुबेसोबत पाचव्या विकेटसाठी 33 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. शिवम दुबेच्या रूपाने संघाला सहावा धक्का बसला तो 27 धावा करण्यात यशस्वी ठरला. त्याचवेळी रवींद्र जडेजाच्या रूपाने सातवी विकेट पडली. जडेजा 2 धावावर बाद झाला तर हार्दिक पांड्या पाच धावा करून नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर केशव महाराज आणि एर्निक नोरखिया यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय मार्को यानसेन आणि कागिसो रबाडा यांना 1-1 असे यश मिळाले.