T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2, Match Update) : T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला असून आता विजेतेपदाच्या लढतीत शनिवारी त्याचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 2022 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा हिशोबही भारताने चुकता केला आहे. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडने उपांत्य फेरीत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला होता.
अशाप्रकारे भारतीय संघाने 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने याआधी 2014 मध्ये टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना तिसऱ्यांदा खेळणार आहे. यापूर्वी 2007 आणि 2014 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताने 2007 मध्ये जेतेपद पटकावले होते, तर 2014 मध्ये त्याचे विजेतेपद हुकले होते.
172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांना कोणतीही मोठी भागीदारी करता आली नाही. इंग्लंडचा निम्मा संघ 50 धावांच्या आत तंबूत परतला होता, त्यानंतर टीम इंडियाचा विजय ही केवळ औपचारिकता राहिली. इंग्लंडचा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 16.4 षटकांत 103 धावांत गडगडला.कर्णधार जोस बटलरने 23 आणि हॅरी ब्रूकने 25 धावांचे योगदान दिले.
इंग्लंडच्या संघाने 3 षटकात एकही विकेट न गमावता 26 धावा केल्यामुळे इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. मात्र पुढच्या 23 धावांत इंग्लिश संघाचे 5 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. एकवेळ संघाची धावसंख्या 5 विकेट गमावून 49 धावा होती. खरे तर पहिल्या 26 धावा ही इंग्लंडच्या कोणत्याही दोन खेळाडूंमधील सर्वात मोठी भागीदारी ठरली. कोणतीही मोठी भागीदारी न होणे हे इंग्लंडच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण होते. संघाच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
भारताकडून फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 19 धावांत तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने 23 धावांत तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2) : रनमशीन ‘विराट कोहली’ पुन्हा ठरला अपयशी…
तत्पूर्वी,दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने प्रथम खेळताना 171 धावा केल्या होत्या. पावसामुळे हा सामना वारंवार थांबवण्यात आला, तरीही कठीण परिस्थितीत टीम इंडिया 170 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरली.
एकेकाळी भारताने अवघ्या 40 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या, मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या 73 धावांच्या भागीदारीने भारतानं सामन्यात पुनरागमन केले.कर्णधार रोहितने 39 चेंडूत 57 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. दुसरीकडे, सूर्यकुमारने 36 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विराट कोहलीने षटकार मारून चांगल्या फाॅर्मात येण्याची चिन्हे दाखवली, पण 9 धावांवर रीस टोपलीने त्याला क्लीन बोल्ड केले. आता कुठ भारत संघ संकटातून बाहेर पडू लागला होता तेवढ्यात फॉर्मात असलेला ऋषभ पंतही अवघ्या 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.येथून रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मिळून 73 धावा जोडल्या आणि मधल्या षटकांमध्ये जोरदार फलंदाजी केली.दोन्ही फलंदाज 13 चेंडूंच्या अंतराने एकापाठोपाठ बाद झालेे.
15 षटकापर्यंत भारताने 3 गडी गमावून 118 धावा केल्या होत्या, परंतु 16 व्या षटकातच सूर्यकुमार यादव 47 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर हार्दिक पांड्याने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. पंड्याने 13 चेंडूंच्या खेळीत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 23 धावा केल्या.त्याने ख्रिस जॉर्डनच्या षटकात दोन दमदार षटकार मारले, पण तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. दुबे हा गोल्डन डकचा बळी ठरला. अक्षर पटेलने सहा चेंडूंत एका षटकाराच्या मदतीने 10 धावा केल्या.शेवटच्या 2 षटकांमध्ये रवींद्र जडेजाने 9 चेंडूत नाबाद 17 धावांची छोटी खेळी खेळली आणि भारताची धावसंख्या 171 पर्यंत पोहोचवली.
रोहित शर्माचे सलग दुसरे अर्धशतक…
रोहित शर्माने T20 विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. यापूर्वी त्याने सुपर-8 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 चेंडूत 92 धावांची तुफानी खेळी केली होती. आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतही त्याने 57 धावा केल्या. रोहितने आता या विश्वचषकात खेळल्या गेलेल्या 7 डावांमध्ये एकूण 248 धावा केल्या आहेत आणि तो या स्पर्धेत भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
जॉर्डनची भेदक गोलंदाजी…
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने एकूण 6 गोलंदाजांचा वापर केला. हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांच्या रूपाने 3 फलंदाज बाद करणाऱ्या इंग्लिश संघाकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक बळी घेतले. त्यांच्याशिवाय जोफ्रा आर्चर, रीस टोपले, सॅम कुरन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.