T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2, Weather Update) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना काही तासांत सुरू होणार आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. गयानामध्ये सध्या (4.38 PM) पाऊस पडत नसला तरी ढगाळ वातावरण आहे. सामना वेळेवर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे, मात्र त्याबाबत आत्ताच काही सांगणे कठीण आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे, हे खरे आहे आणि गेल्या काही दिवसांपासून तुम्ही हे ऐकत असाल. एक्यूवेदर (Accuweather) च्या मते, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सुरुवातीस विलंब होण्याची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता तर भारतीय वेळनुसार रात्री 7.30 वाजता, म्हणजे सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी पावसाची शक्यता सुमारे 66 टक्के आहे. सामन्यादरम्यान हवामान बहुतांशी ढगाळ राहील आणि पाऊस पडेल असा अंदाज आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल, जो भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता आहे. अनेक हवामान संस्थांच्या मते, सामना सुरू होण्याच्या एक तास आधी पाऊस पडण्याची 40 टक्के शक्यता आहे. सामना सुरू होण्याच्या वेळी पावसाची 60 टक्के शक्यता आहे. खरेतर, गयानामध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे आणि सध्या समोर येत असलेल्या चित्रांवरून स्पष्टपणे दिसून येते की प्रॉव्हिडन्स स्टेडियम सामन्याचे आयोजन करण्यास अजिबात तयार नाही.
सामना रद्द झाल्यास …
भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना रद्द झाल्यास टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचेल. कारण सुपर-8 टेबलमध्ये भारताने इंग्लंडपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. एकीकडे भारताने सुपर-8 च्या अ गटातील तिन्ही सामने जिंकून 6 गुण जमा केले. दुसरीकडे, इंग्लंडला 2 सामने जिंकून केवळ 4 गुण मिळवता आले आहेत.