T20 World Cup 2024 (IND vs ENG Semifinal-2) :- टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सुपर 8 गटात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्त्वपूर्ण लढत झाली. या लढतीत भारताने बाजी मारत उपांत्य फेरी गाठली. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना आज(गुरूवार,27 जून) होणार आहे. दोन्ही संघ प्रॉविडेन्स स्टेडियम, गयाना येथे आमनेसामने असतील. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8.00 वाजता सुरू होईल. या महत्वपूर्ण सामन्यावर पावसाचे सावट आहे पण या उपांत्य फेरीसाठी रिझर्व्ह डे अर्थात राखीव दिवसच नाही.
मोठ्या स्पर्धेत बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद असते. प्रत्येक संघ संघर्ष करत बाद फेरीत पोहोचलेला असतो. पावसाने बाधा आणल्यास सगळ्या मेहनतीवर पाणी फेरू शकते. हे लक्षात घेऊन उपांत्य फेरी व अंतिम फेरी अशा मोठ्या सामन्यांना राखीव दिवसाची तरतूद असते. उदाहरणार्थ 2019 सालच्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना दोन दिवस खेळवण्यात आला होता. पण वेस्ट इंडिजमध्ये आयोजित टी-20 गयाना इथे होणाऱ्या सेमी फायनलसाठी राखीव दिवसाची तरतूद नाही.
याचं कारण लॉजिस्टिक्समध्ये आहे. भारत विरूध्द इंग्लड हा सामना गयाना इथे होणार आहे. हा सामना आज (27 जून) होणार आहे. फायनल 29 तारखेला ब्रिजटाऊन इथे होणार आहे. भारतीय संघाच्या उपांत्य फेरीला राखीव दिवस ठेवला तर हा सामना 28 तारखेला खेळवण्यात येईल आणि अशात भारतीय संघाने अंतिम फेरीत स्थान पटकावले तर त्यांना गयानाहून ब्रिजटाऊनला जावे लागेल. त्या प्रवासासाठी पुरेसा वेळ ठेवणे आवश्यक आहे. खेळाडूंच्या बरोबरीने त्यांच्या क्रिकेट साहित्याचे किटही वेळेत पोहोचणे गरजेचे आहे. राखीव दिवस ठेवला तर गयाना ते ब्रिजटाऊन प्रवासाचे गणित बिघडू शकते. हे ध्यानात घेऊन भारताच्या उपांत्य सामन्याला राखीव दिवस देण्यात आलेला नाही.
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत प्लेइंग कंडिशन्सनुसार, भारतीय विरूध्द इंग्लंडच्या उपांत्य फेरीमध्ये पावसाने व्यत्यय आणला तर निर्धारित वेळेपेक्षा 250 मिनिटे अतिरिक्त मिळतील. या अडीचशे अतिरिक्त मिनिटात सामना संपवणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास संघाचे नुकसान होते. स्पर्धेत आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीसारख्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी राखीव दिवस असणे गरजेचे होते. कारण प्रत्येक संघ संघर्ष करत बाद फेरीत पोहोचलेला असतो. पावसाने बाधा आणल्यास सगळ्या मेहनतीवर पाणी फेरू शकते.
दरम्यान, या सर्वात भारतासाठी एक फायद्याची बाब म्हणजे जर पाऊस पडतच राहिला तर मात्र हा सामना रद्द करावा लागेल. तसेच हा सामना एकही चेंडू न खेळता रद्द झाला तर मग भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. कारण सुपर 8 फेरीत भारताने तीनही सामने जिंकून अव्वल स्थान गाठले आहे. त्यामुळे अंतिम फेरीसाठी भारताला पसंती मिळेल.