Pat Cummins Hat Trick & Team India : ऑस्ट्रेलिया संघाने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत मध्ये डकवर्थ-लुईस नियमांनुसार सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 28 धावांनी पराभव करून दमदार सुरुवात केली आहे. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सलग 3 चेंडूत 3 फलंदाज बाद केले. अशाप्रकारे पॅट कमिन्सने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सातवी हॅट्ट्रिक घेतली.
पण तुम्हाला माहित आहे का की, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने हॅटट्रिक घेणे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी चांगले संकेत आहे. वास्तविक, असाच योगायोग जवळपास 17 वर्षांपूर्वी टी-20 वर्ल्ड कपमध्ये घडला होता, जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनली होती.
कमिन्सच्या हॅट्ट्रिकच टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप जिंकण्याशी काय कनेक्शन?
टी-20 वर्ल्ड कपची पहिली आवृत्ती 2007 मध्ये खेळली गेली. भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने बांगलादेशविरुद्ध सलग 3 चेंडूत 3 फलंदाज बाद केले होते. अशा प्रकारे ब्रेट लीने हॅटट्रिक पूर्ण केली होती. यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले होते.
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजानेच बांग्लादेश विरुद्धच हॅट्ट्रिक घेतली आहे. बांग्लादेश विरुद्ध कमिन्सने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 3 विकेट काढल्या. ज्यात त्याने हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला. पॅट कमिन्स टी20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा ब्रेट ली नंतरचा दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे. त्यामुळे हा टीम इंडिया यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्याचे संकेत तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.
हे सर्व लक्षात घेता आता टीम इंडियाचे चाहत्यामध्ये ही अशीच चर्चा आहे , 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये वेगवान गोलंदाज ब्रेट लीने हॅटट्रिक केली होती. त्याच वर्षी भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. खास गोष्ट म्हणजे ब्रेट लीनेही त्याची हॅटट्रिक बांगलादेशविरुद्धच केली होती. आता टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आणखी एका वेगवान ऑस्ट्रेलियन बॉलरने बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक केल्याने या वेळीही टीम इंडियाच्या विजेतेपदाचा योग तर नाही ना, अशा चर्चा होत आहे.
भारताचे पुढील सामने…
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया गट-1 मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे समान 2-2 गुण असले तरी ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट चांगला आहे. त्याचवेळी भारतीय संघाने अफगाणिस्तानचा पराभव केला. आता भारत आणि बांगलादेशचे संघ 22 जूनला आमने-सामने येणार आहेत. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 24 जूनला आमने-सामने येतील.