Team India T20 Captain : भारताने गेल्या शनिवारी टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाने एकीकडे भारतीय क्रिकेटप्रेमी जल्लोषात होते, मात्र काही वेळातच कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्याशिवाय विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला टी-20 फॉरमॅटमध्ये एका नवीन कर्णधाराची गरज आहे. चला तर मग एक नजर टाकूया, त्या 3 खेळाडूंवर जे रोहित शर्माच्या जागी भारताच्या टी-20 टीमचे कर्णधार बनू शकतात.
1. हार्दिक पंड्या : हार्दिक पांड्याला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. स्पर्धेदरम्यान त्याने बॉल आणि बॅटनेही योगदान दिले. हार्दिकने आतापर्यंत 16 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 10 वेळा संघाने विजय मिळवला आहे. त्याच्याकडे आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे कारण त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स 2022 मध्ये चॅम्पियन बनले होते. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाचा देखील कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा देखील पराभव केला आहे. हार्दिककडे कर्णधारपदाचा अनुभव आहे आणि तो यशस्वीही झाला आहे, पण कोणाला कर्णधार बनवायचे हे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे.
2. ऋषभ पंत : ऋषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर त्याने आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन केले आणि 446 धावा केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये जाण्याच्या अगदी जवळ आली होती. पंतला 5 सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभवही आहे. पंत विश्वचषकातील संथ खेळपट्ट्यांवर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता. 8 सामन्यात एकूण 171 धावा करून, त्याने दाखवून दिले की तो टी-20 फॉरमॅटमध्ये संघासाठी एक विश्वासार्ह खेळाडू बनू शकतो आणि संघाचा भारही सांभाळू शकतो.
3. ऋतुराज गायकवाड : ऋतुराज गायकवाडला भारतीय राष्ट्रीय संघात सातत्यपूर्ण संधी मिळाली नसली तरी त्याने आतापर्यंत भारतासाठी 19 टी-20 सामन्यांत 500 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. आयपीएल 2024 मध्ये, त्याच्या नेतृत्वाखाली, त्याने चेन्नई सुपर किंग्जला जवळजवळ प्लेऑफमध्ये नेले. त्याने 3 टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले आहे, त्यापैकी 2 वेळा टीमने विजय मिळवला आहे. या आकडेवारीवरून गायकवाड हा भारतीय संघाचा कर्णधार होण्याचा मोठा दावेदार असल्याचे सिद्ध होते.