वडूज – खटाव-माण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील उडी घेतली आहे. बारामती येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत संघटनेच्या खटाव व माणमधील पदाधिकार्यानी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार राजू शेट्टी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकर्यांच्या प्रश्नांवर खटाव-माण विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या ताकदीने काम करत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये संघटनेने आक्रमक आंदोलने करून, उसाचा दर 2500 रुपयांवरून तीन हजार रुपयांच्या जवळपास मिळवून दिला आहे. त्याशिवाय इतर शेतमालाच्या दरांचे लढे लढवून, शेतकर्यांना लाभ मिळवून दिला आहेत. व्यापार्यांच्या मनमानीमुळे अडचणीत आलेल्या आले उत्पादकांसाठी संघटना लढाई लढत आहे. गेल्या वर्षभरात व्यापार्यांना सरसकट आले खरेदी करायला लावून, शेतकर्यांना कोट्यवधी रुपये मिळवून दिले आहेत. त्याचबरोबर संघटनेने पाणी प्रश्नावर सातत्याने आंदोलने केल्याने उरमोडी आणि तारळीचे पाणी लाभक्षेत्रात पोहोचले आहे.
तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य माणसांची ससेहोलपट थांबवण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. उरमोडी आणि तारळीच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले बेमुदत उपोषणही गाजले होते. विजेच्या प्रश्नावरील मोर्चे आणि आंदोलने यामुळे खटाव-माणवासीयांमध्ये संघटनेविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्येही संघटना गावागावात पोहोचल्याने कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे खटाव-माण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची आग्रही भूमिका पदाधिकार्यांनी घेतली. त्यावर राजू शेट्टी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
खटाव ही क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या ठिकाणी क्रांतीची ठिणगी पडली होती. शेतकरी चळवळीच्या माध्यमातून खटाव व माण तालुक्यांमध्ये स्वाभिमानीचे काम चांगले आहे. कार्यकर्त्यांची तगडी फौज संघटनेकडे आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी यासह समाजाच्या सर्व स्तरातील घटकांना मदत करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते तन-मन धन अर्पून काम करतात.
– राजू शेट्टी
अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
राजकीय पक्ष आणि प्रस्थापितांनी राजकारणाचा बाजार भरवला आहे. त्याचा लोकांना उबग आला आहे. अशा वेळी चांगला व सक्षम पर्याय देण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी आमच्यासमोर अनेक वेळा व्यक्त करतात. आमदार, खासदार, बँकर, मोठे व्यापारी, विमा कंपनी, कृषी, महसूल विभाग शेतकर्यांना चुकीच्या पद्धतीने वागवत असेल, तर त्यांना नडण्यात संघटनेचा कार्यकर्ता कोणत्याही परिस्थितीत कमी पडत नाही. म्हणूनच लोकवर्गणीतून ‘एक व्होट एक नोट’ या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
– अनिल पवार
राज्य प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना.