राजगुरूनगर : लोकसभा निवडणुकीच्या काळात खेडचे प्रातांधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहारद्वारे बिनबुडाचे आरोप केल्याने जनमानसात शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. यावरुन कट्यारे यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कट्यारे यांना शाससकीय सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
याबाबतचे आदेश शासनाचे अपर सचिव संजीव राणे यांनी काढले आहे. लोकसभा मतमोजणीच्या दोन दिवस अगोदर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावाखाली म्हणजे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी संगनमताने काम करत असल्याचा आरोप कट्यारे यांनी केला होता. तसेच याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे प्रधान सचिव, महसूल सचिव यांना थेट पत्र पाठविले होते. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून पदभार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काढून घेतला होता.
आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी कट्यारे यांच्याबाबत शिस्तभंग केल्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाकडून २० जून रोजी कट्यारे यांना महसूल विभागाकडून नोटीस पाठवून आठ दिवसात लेखी उत्तर मागविले होते. मात्र कट्यारे यांनी नोटीस नाकारली. व कुठलेच उत्तर दिले नसल्याने शुक्रवारी त्यांच्यावर गैरवर्तनुकीचे दोषारोप निश्चित करून सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.