नवी दिल्ली – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या परीक्षांमधील घोळांच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून त्या विद्यार्थ्यांनी उद्या (मंगळवार) संसदेच्या दिशेने मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे.
एनटीएने घेतलेल्या नीट युजी-पीजी, युजीसी नेट या परीक्षा विविध घोळांच्या आरोपांवरून वादग्रस्त ठरल्या. त्यामुळे एनटीए ही संस्था चौफेर टीकेची धनी बनली आहे.
त्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी मागील ६ दिवसांपासून इंडिया अगेन्स्ट एनटीए या नावाने आंदोलन सुरू केले आहे. एनटीए बंद करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आदी आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या आहेत.