– डॉ. विनोद गोरवाडकर
आषाढी-कार्तिकी एकादशीची प्रतिक्षा लाखो जन करीत असतात. भक्तीचा मळा चंद्रभागेच्या काठी या विठूवेड्यांच्या उपस्थितीने जेव्हा फुलतो तेव्हा अवघा महाराष्ट्र पावन झाल्यासारखे वाटते.
महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित खर्या अर्थाने काय असेल तर, या भावभरल्या भक्तजनांच्या मनांमधलं साधंसुधं, शुद्ध, खरं, सात्विक, भोळं आणि कमालीचं अंतर्यामी असं भक्तीचं बीज! ‘महाराष्ट्राचं लोकदैवत श्रीविठ्ठल’ ही उक्ती, लाखो वारकरी शिस्तीने भक्तीत दंग होऊन पंढरीच्या भेटीसाठी शेकडो मैलांची वाट हसत हसत चालत पूर्ण करतात, त्यावेळी खर्या अर्थाने सार्थ होताना दिसते. हा ‘कानडा राजा पंढरीचा’ लोकमानसात वसलेला आहे. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून तो पार भारताबाहेर पसरला आहे. सार्या संतांची मांदियाळी या विठूरायाच्या चरणी लीन झालेली दिसते आणि त्याच्यावरील निस्सीम भक्तीपोटी घरदार विसरून सर्वांच्या पलीकडे संतांचा मेळा ज्यावेळी जाताना दिसतो, त्यावेळी आपोआपच सामान्य वारकरीही स्वत:च्या मनातल्या भक्तीमार्गात लीन होण्याच्या भावनेशी एकरूप होतो, ही गोष्ट सामान्य नाही.
‘विश्वाचे आर्त आम्हा घरी प्रकाशले’ म्हणणारे ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा मार्ग कितीतरी पट रूंद करतात आणि तुकोबाराय जगत्गुरू पदाला पोहचून ‘तुका झालासे कळस’ ठरतात, ही या भक्तीमार्गाची खरी श्रीमंती ठरली. पंढरपूरची ओढ ही सामान्य ओढ नाहीच मुळी! ती जन्मजन्मांतरीच्या पुण्याईतून निर्माण होणारी ओढ आहे. ज्याचं संचित थोर, त्यालाच या ‘पंढरीच्या राजा’चं दर्शन घडतं.पंढरीची वारी एकीकडे भक्तीचा श्रेष्ठ आविष्कार दाखविते, दुसरीकडे कुठल्याही प्रकारचे वेगळे प्रयत्न न करता समाजाला सर्वसमावेशक जीवन जगण्यासाठीचा योग्य मार्ग दर्शविते. भक्ती, शक्ती आणि नीती या त्रयीसोबत माणसाची माणसासोबत असणारी नाती घट्ट करणारी वीण या पंढरीच्या वारीतून आपोआपच तयार होते.
आपपरभावाला मनामध्ये किंचितही स्थान न मिळण्याची जागा म्हणजे पंढरीची वारी होय. संपूर्ण हयात पंढरीची वारी करणारे, ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा आणि विविध संतांचे विविध वाङ्मय मुखोद्गत असणारे वारकरी सार्या जगाला भक्तीचा आणि हरिहरैक्य शक्तीचा संदेश देत असतात.संतांनी समाजमनाला सुस्थापित करण्यासाठी वाङ्मयनिर्मिती केली. संत समाजसुधारक होते. अंधश्रद्धा सोडा, जातीभेद तोडा, चांगलं वागा, निसर्गावर प्रेम करा, नीतीने वाटचाल करा या संतांच्या वाङ्मयातील शिकवणीचा अर्थ काय, तर तो हाच, समाजाने स्वत:चे हित कशात आहे, हे ओळखून मार्गक्रमण करावे.
संतवचनांची उजळणी या वारीच्या निमित्ताने प्रतिवर्षी होत असते. वारीच्या मुक्कामात भजन-कीर्तन-भारुडांचा रंग उसळतो. पायी चालताना गवळणी-अभंग म्हटले जातात. तुळशीमायची पूजा केली जाते. एकोप्याने सर्वजण एकत्रित जेवण करतात. समानतेचे सूत्र अशाप्रकारे वारीभोवती असते.महाराष्ट्राचा हा समृद्ध वारसा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चालला आहे. संतांचे अक्षरवाङ्मय हजारो ओठांमधून पुढील पिढ्यांसाठी हस्तांतरित होते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठलाही राजकीय रंग या सार्या प्रक्रियेला लागलेला नाही आणि तो भविष्यातही कधी लागणार नाही.
विविध परंपरांचे वैभव येथे नांदते आहे. त्यातीलच शेकडो वर्षांची वारीची परंपरा पंढरीच्या प्रांगणात येऊन एकवटते आणि पंढरपूर खर्या अर्थाने गर्जायला लागतं. महाराष्ट्र भ्ाूमीच्या पटलावर नाथ, महानुभाव, दत्त आणि समर्थ या चार भक्ती संप्रदायांसोबत अत्यंत महत्त्वाचा आणि मराठी मनावर अधिराज्य करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय समजला जातो. स्वीकारण्यास सोपा, आचरण्यास तर त्याहूनही सोपा पण तत्त्वज्ञानाची बैठक असणारा, प्रेम-जिव्हाळा-वात्सल्य-आपुलकीने न्हाऊन निघालेला आणि भक्तीपथावरून प्रामाणिकपणे निघाल्यास मुक्तीपर्यंत नेऊन सोडणारा हा संप्रदाय जणू मराठी माणसाच्या मनमानसावर गेली शेकडो वर्षे अधिराज्य गाजवताना दिसतो.
श्री विठ्ठलाचे लोकदेवत्व हा सार्यांचा आवडीचा भाग आहे. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत श्री विठ्ठल असल्याने घराघरात विठ्ठलाचे पूजन केले जाते. ज्ञानदेव-नामदेव काळाच्या आधी भक्त पुंडलिकाची महती या भूमीवर गायिली जात होती. या भक्तराजाला श्रीविठ्ठल भेटले. त्यापाठीशी एक आख्यायिका सांगितली जाते. पद्मपुराणतील या कथेचा सारांश असा की शोडषवयात व त्यानंतर तारुण्यात पुंडलिक हा स्त्रीमध्ये गुंतलेला आणि मात्यापित्यांचा उपहास करणारा सामान्य माणूस होता. परंतु त्याच्या जीवनात एक दिवस मोठे परिवर्तन घडले. कुक्कुटस्वामी या महान तपस्वाची आणि त्याची भेट झाली. कुक्कुटस्वामींच्या व्यक्तिमत्त्वाचा पुंडलिकावर कमालीचा प्रभाव पडला आणि तो आमूलाग्र बदलला.
पुंडलिक आईवडिलांची सेवा करू लागला. पंढरपूर ही त्याची कर्मभूमी. एक दिवस रूक्मिणी श्रीकृष्णावर रुसून दिंडीरवनात गेली असता श्रीकृष्ण तिचा शोध घेत पुंडलिकाच्या घरी पोहोचले. त्यावेळी पुंडलिक आई-वडिलांची सेवा करीत होता. त्यामुळे डाव्या हाताने त्याने देवाला उभे राहण्यासाठी वीट फेकली. सेवा संपल्यावर विटेवर उभ्या असलेल्या देवाला पुंडलिकाने वंदन केले. देवाची स्तुती केली. देव प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकास वर मागण्यास सांगितले. तेव्हा पुंडलिकाने ‘देवाने या रूपात असेच उभे रहावे, अज्ञानी जीवांचा उद्धार करावा आणि हे क्षेत्र माझ्या नावाने म्हणजे पुंडरीकपूर म्हणून प्रसिद्ध व्हावे’ असा वर मागितला. देवाने तथास्तू म्हटले. खरं म्हणजे भागवत धर्माची पताका पुंडलिकाने ही अशी रोवली.