दिवस खरोखर चमत्कारिक आहेत आणि मानसिकतेत होणारे बदल अनाकलनीय आहेत. एकीकडे काहीच अंगाला लावून न घेण्याइतकी बेफिकिरी वाढताना दिसते, तर दुसरीकडे नको त्या गोष्टी अति प्रमाणात मनावर घेतल्यामुळं होणारे दुष्परिणामही स्पष्टपणे दिसतात. उदाहरणार्थ, एखाद्याच्या मृत्यूनंतर दुखवटा पाळला जाणं, हा जणू भूतकाळच झालाय. ती अपरिहार्यता आहे, असंही नाही. पण हातातली गॅजेट्स कुणाला फार काळ दुःखात राहूच देत नाहीत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानासुद्धा अनेकजण हल्ली आपला ‘सोशल कनेक्ट’ तुटू देत नाहीत. सोशल मीडियावर एकदा ‘आरआयपी’ टाइप केलं, की नेहमीची भंकस नव्या दमानं करायला आपण मोकळे असतो.
निसर्गही पूर्वीसारखा आपल्याला मोहवून टाकत नाही. तिथेही ‘मी’महत्त्वाचा ठरतो आणि जिवंत रसरशीत अनुभवाकडे सपशेल पाठ फिरवून त्या दृश्यातला ‘मी’ शोधत आपण रील्स बनवू लागतो. ती रील्स आपल्या आधी शहरात पोहोचतील अशी व्यवस्था करतो. एखाद्या रम्य ठिकाणी ‘नेटवर्क’ नसेल, तर इतके दुःखी-कष्टी होतो, की भरभरून आनंद देणारा निसर्गही लाजावा. दुसरीकडे, काही गोष्टी मात्र आपण अतोनात मनावर घेतो. आयपीएल स्पर्धा सुरू असताना कोल्हापुरात घडलेली घटना आठवत असेलच. लाडक्या क्रिकेटपटूबद्दल वाईट बोलला म्हणून एकानं दुसर्याचा खून केला होता. खेळ आणि राजकारण या बाबतीत मतभेद असल्यामुळं संबंध बिघडल्याची शेकडो उदाहरणं आपल्याला अवतीभवती दिसतात. विकोपाला गेलेल्या वादामुळं हिंसाचारही होतो.
आपल्यात झालेले हे भयानक बदल इंग्लंडच्या नॅशनल सेंटर फॉर व्हॉयलन्सच्या संशोधनात उघड झालेत. जगभरात क्रिकेटपेक्षा फुटबॉलचे चाहते कितीतरी अधिक संख्येनं आहेत. चाहत्यांचं खेळात ‘इनव्हॉल्व्ह’ होणं, म्हणजे अक्षरशः पागल होणं. फुटबॉल हा खेळ मुळातच अत्यंत गतिमान… सामन्यांना होणारी गर्दी अफाट! फुटबॉलच्या सामन्यांदरम्यान चाहत्यांमध्ये होणार्या हाणामार्या जगाला नवीन नाहीत. किंबहुना तो खेळाचाच एक भाग मानला गेलाय. पण ताज्या संशोधनात असं दिसून आलंय, की फुटबॉलच्या सामन्यादिवशी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाही वाढतात. इंग्लंडचा संघ ज्या दिवशी पराभूत होईल, तेव्हा कौटुंबिक हिंसा तब्बल 38 टक्क्यांनी वाढते. हा फुटबॉल ज्वर लवकर उतरतही नाही, त्यामुळं सामन्याच्या दुसर्या दिवशीही कौटुंबिक हिंसेच्या घटना 11 टक्क्यांनी वाढतात. सामना बघून सळसळणारं रक्त घरी गेल्यावर गुण दाखवतं.
बर्याच वेळा पत्नी किंवा गर्लङ्ग्रेंडला हिंसा सहन करावी लागते. फुटबॉलच्या सामन्यावेळी केलं जाणारं मद्यप्राशन आगीत तेल ओतण्याचं काम करतं. सामना हरल्यास बिघडलेली मानसिकता या फुटबॉल शौकिनांकडून वाट्टेल ते करवून घेते.सामन्याचा तणाव, पराभवानंतरची निराशा आणि व्यसन हे रसायन अत्यंत खतरनाक असतं. संशोधकांच्या मते, आपापल्या टीमकड़ून शौकिनांना असलेल्या अपेक्षा बर्याच वेळा अवास्तव असतात. समोरच्या संघाची ताकद आणि आपल्या संघाचे कमकुवत दुवे त्यांना दिसतच नाहीत. टीमच्या प्रेमात ते आंधळे होतात आणि निराशा हाती लागली, की रागाने बेफाम होतात. खेळाकडे खेळ म्हणून पाहण्याचा विवेक संपून जातो आणि त्याचा फटका कुटुंबाला बसतो. प्रतिष्ठेच्या स्पर्धा आणि सामने असतील, तेव्हा प्रशासनाला यासंदर्भात इशारा जारी करावा लागतो, यावरूनच प्रश्नाचं गांभीर्य ओळखूया आणि भलत्या गोष्टी मनावर घेणं टाळूया.