मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केल्याने सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर अंबादास दानवे यांचे 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. एवढेच नाहीतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. यादरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधांरे?
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावताना खासदार रमेश बिधूडी, आमदार संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांचा उल्लेख करत त्यांनी भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा प्रश्न विचारला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटल कि, शिवीगाळ करणे योग्य नाही. असे अपशब्द वापरणाऱ्याचे निलंबन करायला हवे हे शहाणपण गिरीश महाजनांना तेव्हा का सुचले नाही जेव्हा रमेश बिधूडी नावाचा खासदार दानिश आली बद्दल अत्यंत अभद्र भाषेत बोलत होता. किंवा संजय शिरसाट अब्दुल सत्तार यांच्यासारखी माणसं महिलांबद्दल गलिच्छ भाषेत बोलत होती असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
सभागृहात नेमके काय घडले?
लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्दावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. त्याचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत पाहण्यास मिळाले. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. यादरम्यान दानवे यांनी लाड यांना शिवीगाळ केली होती.