मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना या राजकीय पक्षाच्या स्थापनेला आज 58 वर्ष पूर्ण झाली. आज त्यांचा वर्धापन दिन आहे. आज शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. मात्र शिवसेनेला बंड ही काही नवीन गोष्ट नाही आहे. आतापर्यंत शिवसेनेमध्ये ४ वेळा बंड झाले आहे. ही बंड कोणती आणि ती कोणी केली याबद्दल आज जाणून घेऊया…
शिवसेनेमध्ये पहिलं बंड केले ते सध्या अजित पवार गटात असलेल्या छगन भुजबळ यांनी. 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात असलेल्या भुजबळांनी 1991 मध्ये डिसेंबर महिन्यात भुजबळ यांनी 19 आमदारांसहीत बंड केलं. 1991 साली भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षातील प्रमुख नेते झाले. यानंतर 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली.
दुसरे बंड केले ते नारायण राणे यांनी. मूळचे कणकवलीचे असणारे राणे यांनी चेंबूरमधून एक कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. 1990 ला राणे मालवण मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 1999 ला ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्याच वर्षी शिवसेना-भाजपा युतीचा पराभव झाल्याने राणे विरोधीपक्ष नेते झाले. 2005 मध्ये राणेंनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये गेले. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन केला. 2019 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत ते रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून खासदार म्हणून निवडून आले.
तिसरे बंड केले ते राज ठाकरेंनी. आपल्या घरातीलच व्यक्तीने बंड केल्याने बाळासाहेब ठाकरेंना मोठा धक्का बसला.राज ठाकरेंनी पक्षात होणारी घुसमट आणि आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे असं म्हणत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 2006 च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. यानंतर 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.
शिवसेनेमध्ये चौथे बंड केले ते एकनाथ शिंदेंनी. हे बंड आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड म्हणावे लागेल. यामध्ये आमदारांनी फक्त पक्ष न सोडता पक्षावर आपला दावा ठोकला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यापासून प्रभावित होऊन शिंदेंनी 1980 च्या दशकात शिवसेनेत प्रवेश केला. 1997 साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली आणि ते निवडणूक जिंकून नगरसेवक झाले. 2015 ते 2019 पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. 2004, 2009, 2014, 2019 असे सलग चार वेळा ते याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. जून 2022 मध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखालील एका गटाने शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महविकास आघाडीच्या सरकारमधून शिंदेनी 40 आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला. त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार पडलं. नंतर भारतीय जनता पार्टीच्या समर्थनाच्या आधारावर त्यांनी सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले.