बारामती – ही निवडणूक साधी सोपी नव्हती, यापूर्वी मी निवडणुकीला जास्त येत नव्हतो. एक-दोनवेळा मी यायचो आणि निवडणूक तुमच्या हाती देऊन मी महाराष्ट्रभर फिरायचो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अधिक लक्ष द्यावं लागलं. पण, येथील लोकं माझ्या पाठिशी आहेत, याची मला खात्री होती, असे म्हणत येथील शालेय शिक्षणपासूनची सुरुवातही पवारांनी सांगितली. शरद पवार त्यांच्या जन्मगाव काटेवाडीतील लोकांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला.
लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा दौरे सुरू केले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बारामतीमधील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे मेळावे घेत आहेत. आज त्यांनी बारामतीमधील काटेवाडी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी लोकसभा निवडणूक कशी झाली? तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या महाराष्ट्रातील सभा, अशा विविध विषयांवर भाष्य केले.
शरद पवार म्हणाले, “बारामतीच्या निवडणुकीत मी जास्त येत नव्हतो. एकदा प्रचाराचा नारळ फोडला की, निवडणूक तुमच्या हातात आणि मी महाराष्ट्रात जात असे. या वर्षीही काही प्रमाणात तसेच होते. पण ही संघर्षाची निवडणूक होती. यावेळी एक प्रकारची शक्ती दिल्लीपासून लावण्यात आली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात माळशिरस, कराड, अहमदनगर, नाशिकसह अनेक ठिकाणी आले. मोदी महाराष्ट्रात आले की एकच विषय असायचा, फक्त शरद पवार. देशाचे पंतप्रधान जवळपास निम्या वेळेपेक्षा जास्त माझे नाव घेतात ही काय साधी गोष्ट आहे का? त्यांना काटेवाडीकरांचा चमत्कार कळला”, असा हल्लाबोल शरद पवारांनी मोदींवर केला.
फलक त्यांचे लागू द्या, विजय आपलाच –
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, काही ठिकाणी पैशाचे वाटप झाले असे म्हणतात खरे-खोटं माहीत नाही. पण, मागच्या गोष्टी काढायच्या नाहीत, काम करीत राहायचं. देशात लोकशाही आहे, पण इथे हुकूमशाही आणायचा प्रयत्न होता. पण, तुम्हा लोकांमुळे लोकशाही टिकली. मला कुणीतरी सांगितले की गावागावात फलक दिसत आहेत. त्यांना मी म्हणालो त्यांचे फलक आपले यश, निवडून कोण आले हे महत्त्वाचे. आपण बाकी गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी अजित पवारांना देखील टोला लगावला.