सातारा – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी जिल्हा काँग्रेसने पन्नास टक्के म्हणजेच चार जागांची मागणी प्रदेश काँग्रेस समिती व महाविकास आघाडीकडे करावी. या सर्व जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या ताकदीने प्रयत्न करतील, असा एकमुखी ठराव जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या येथे सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रभारी श्रीरंग (नाना) चव्हाण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, महिला अध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई उपस्थिते होते. विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाणार असल्यामुळे जिल्ह्यातील पन्नास टक्के म्हणजे चार विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत प्रदेश कॉंग्रेसकडे पाठवावी व प्रदेशने महाविकास आघाडीकडे तसा प्रस्ताव ठेवावा अशी मागणी सर्व तालुकाध्यक्षांनी केली. प्रदेश काँग्रेसकडे प्रस्ताव पाठवून निम्या जागांच्या मागणीवर आपण ठाम राहू, असे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.
जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले. मात्र, थोडक्यात पराभवाला सामोरे जावे लागले, याची सल असून आता मागे वळून न पाहता विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहवे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारसंघ काँग्रेसला मिळवण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडे ही मागणी लावून धरेन.
लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. सर्व तालुकाध्यक्षांनी तालुक्यात चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवल्याचे सांगितले. काँग्रेसने प्रचार यंत्रणा राबवली त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारास मताधिक्य मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष, संघटना यांनी एकत्र काम केले तर विधानसभेच्या सर्व जागा जिंकणे अवघड नसल्याने मत तालुकाध्यक्षांनी व्यक्त केले. बैठकीस महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, प्रदेश प्रतिनिधी बाबासाहेब कदम, रफिकशेठ बागवान, राजुभैय्या मुलाणी, सर्व तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण (सातारा), ॲड. श्रीकांत चव्हाण (कोरेगाव), अभिजित पाटील (पाटण), संदीप माने (जावळी), विलास पिसाळ (वाई), सर्फराज बगवान (खंडाळा), डॉ. संतोष गोडसे (खटाव), नंदकुमार बावळेकर (महाबळेश्वर), सेवादल जिल्हाध्यक्ष प्रतापराव देशमुख, विराज शिंदे, कल्याण पिसाळ, अन्वर पाशाखान, एम. के. भोसले, युवक अध्यक्ष अमरजित कांबळे, अमित जाधव, सलीम बागवान, उमेश मोहिते, नाजीम इनामदार, डॉ. शंकर पवार, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
अभिनंदनाचे विविध ठराव मंजूर
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने देशात शंभर जागा जिंकल्या. जनतेचा आवाज लोकसभेत मांडण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाल्याबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटीकडून राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव प्रदेश सचिव राजेंद्र शेलार यांनी मांडला. त्यास जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांनी अनुमोदन दिले. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश प्रचारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने १३ जागांवर विजय मिळवला. त्याबाबत अभिनंदनाचा ठराव नरेश देसाई यांनी मांडला. त्यास अल्पना यादव यांनी अनुमोदन दिले.