मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर यांची 11 जानेवारी रोजी 125 वी जयंती आहे. त्यानिमित्त….
प्रतिभासंपन्न साहित्यिक, उत्तम शिक्षक, संपादक, कवी, कथालेखक, चित्रपट पटकथा लेखक, समीक्षक अशा अनेक प्रांतांत आपल्या लीलया लेखणीने संचार करणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणजे वि. स. खांडेकर! त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी सांगलीतील प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिरात झाला. त्यामुळे त्यांचे नाव गणेश ठेवण्यात आले. खांडेकर कुटुंबीय हे मूळचे कोकणातील सावंतवाडीचे होते. आत्माराम बळवंत खांडेकर हे त्यांचे वडील तर रमाबाई आत्माराम खांडेकर या त्यांच्या मातोश्री. खांडेकरांचे शालेय शिक्षण सांगली येथे झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांनी अपूर्व यश संपादन करून त्याकाळी आठवा क्रमांक मिळवला होता. सन 1913 मध्ये त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी खांडेकर पुणे येथील शाळूकर बोळातील सांगलीकरांच्या वाड्यात राहात होते. बन्याबापू कमतनुकर यांच्यामुळे त्यांची व राम गणेश गडकरी यांची ओळख झाली. एकदा गडकरी त्यांना बालगंधर्व यांच्याकडे घेऊन गेले व त्यांची “हा कोल्हटकरांच्या गाडीचा वारस आहे’, अशी ओळख करून दिली. सन 1914 मध्ये त्यांनी “रमणीरत्न’ हे मराठी नाटक लिहिले. तसेच ते त्याकाळी “कुमार’ या टोपणनावाने कविता लिहीत असत. यामुळे त्यांचा व गडकरी यांचा स्नेह अधिकच दाट झाला.
13 जानेवारी 1916 रोजी त्यांचा दत्तकविधी रामभा झाला व गणेश आत्माराम खांडेकर हे विष्णू सखाराम खांडेकर झाले.
सन 1919 मध्ये त्यांनी “उद्यान’ व “नवयुग’ या मासिकातून लेखनाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीस ते कथा लिहीत असत. श्रीमतकलिक पुराण ही त्यांची पहिली विनोदी कथा उद्यान मासिकात “आदर्श’ या टोपणनावाने प्रसिद्ध झाली. 1926 नंतरचा काळ हा मराठी नियतकालिकांचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळी ज्योत्स्ना, किर्लोस्कर, धृव, प्रतिमा, यशवंत, नवयुग, अरविंद, लोकमान्य, प्रमोद, सुमन, मनोरंजन, रत्नाकर या सारखी नियतकालिके गाजत होती. या सर्व नियतकालिकात खांडेकरांच्या कथा प्रसिद्ध होत असत. रंजकतेपेक्षा प्रबोधन करणारे लेखक म्हणून ते जनमानसात प्रसिद्ध होते. आपले लेखन काळ आणि आजपेक्षा उद्या अधिक कसदार होईल याचा त्यांना कायमच ध्यास जडला होता. ते फक्त मराठी कथेचे ते अनभिषिक्त सम्राट नव्हते तर मराठी कथेचे शिल्पकारही होते. रघुवीर सामंत यांच्या पारिजात मासिकाचे त्यांनी साहित्यिक वा. ल. कुलकर्णी यांच्या समवेत अनेक वर्षे संपादन केले.
सन 1928 मध्ये त्यांनी रंकाचे राज्य हे संगीत नाटक लिहिले. पारिजात मासिकाच्या संपादनाचा अनुभव त्यांना आल्याने त्यांनी 1924 ते 1930 या काळत वैनतेय हे साप्ताहिक व 1936 ते 1940 या काळात ज्योत्स्ना हे मासिक चालवले. 16 जानेवारी 1929 रोजी त्यांचा विवाह बेळगाव येथे पार पडला व कु. मनुताई मणेरीकर या सौ. उषाताई खांडेकर झाल्या. खांडेकर त्यावेळेस शिरोडा येथे ट्युटोरिअल हायस्कूलमध्ये शिक्षक होते.
1938 मध्ये खांडेकर कोल्हापूर येथे कायमचे आले व त्यांनी चित्रपट निर्माते व अभिनेते मास्टर विनायक यांच्या शाहूपुरी येथील बंगल्यात आपले बिऱ्हाड थाटले. त्यानंतर त्यांचे काहीकाळ वास्तव्य खासबाग येथील मुग यांच्या घरी, राजारामपुरी येथील मुक्ताश्रम येथे होते. त्यांचे राजारामपुरी येथील नंदादीप बंगल्यात अखेरपर्यंत वास्तव्य होते. खांडेकर यांचे सर्वच साहित्य दर्जेदार आहे. त्यांच्या साहित्यावर पुरोगामीपणाची एक वेगळी छाप पडली आहे. तसेच गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद, मानवतावाद यांचा जणू संगम झाला आहे. त्यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा व पं. नेहरू यांच्या पंचशील तत्वांचा प्रचंड प्रभाव होता. ते बोलके समाजसुधारक नसले तरी कृतीशील विचारवंत होते.
मराठी भाषेप्रमाणे संस्कृत व इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. महाकवी कालिदास, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, शरद्चंद्र, प्रेमचंद, ओहेन्री, चेकोव्ह, टॉलस्टॉय, खलिल जिब्रान, हर्बट बेट्स व सॉमरसेट मॉम हे त्यांचे आवडते लेखक. खांडेकरांची एक विशेष आठवण म्हणजे, “ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ या पं. नेहरू यांच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद माझे आजोबा ज्येष्ठ पत्रकार व लेखक शंकर लक्ष्मण चिटणीस यांनी करायचा ठरवला. त्यानुसार त्यांनी पं. नेहरूंना पत्र लिहून त्यांची परवानगी मागितली. त्यावेळी माझे आजोबा जेमतेम 30 वर्षांचे होते. पं. नेहरू यांनी पाठवलेल्या पत्राच्या उत्तरात असे लिहिले होते की, अनुवाद चांगला होण्याच्या दृष्टीने तुम्ही एखाद्या मान्यवर साहित्यिकाची शिफारस घ्या. तेव्हा कोल्हापूर येथे राहणाऱ्या वि. स. खांडेकर यांना आजोबांनी ते पत्र दाखवले. त्यावर खांडेकरांनी शं. ल. चिटणीस हे तुमच्या पुस्तकाचा अनुवाद चांगला करतील असे पत्र पं. नेहरूंना पाठवले. त्यानुसार पुस्तकाच्या अनुवादाचे काम सुरू झाले आणि एप्रिल 1942 मध्ये पं. नेहरू यांच्या पुस्तकाचा “धावते जग’ या शीर्षकाखाली पहिला भाग प्रकाशित झाला. खांडेकर म्हणत, की तुमच्या घरावरून संधीच घोडं एकदा जातं. त्यावर स्वार व्हायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवावं.
खांडेकरांना एकदा एका गृहस्थानं विचारलं ंकी, स्त्री आणि इस्त्री या दोघांत साम्य काय आहे? यावर ते मिश्किलपणे म्हणाले, दोघीही तापल्या की चटका बसतो. 15 कादंबऱ्या, 43 कथासंग्रह, 15 लघुनिबंधसंग्रह, 4 रूपककथा संग्रह, 1 प्रस्तावना संग्रह, 11 लेखसंग्रह, 4 व्यक्ती आणि वाङ्मय, 2 व्यक्तिचित्रे, 3 अनुवादित रूपककथा, 2 काव्यसंग्रह, 3 भाषणसंग्रह, 1 मुलाखतसंग्रह, 2 नाटके, 8 संपादित कथासंग्रह, 3 संपादित कादंबऱ्या, 4 संपादित लघुनिबंध संग्रह, 2 संपादित निबंधसंग्रह, 3 संपादित काव्यसंग्रह व 3 संपादित नाट्यसमीक्षा, 2 गौरवग्रंथ आणि अर्नेस्ट टोलर यांच्या पत्रांचा तुरुंगातील पत्रे असा अनुवाद अशी दर्जेदार साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. त्यांनी साहित्यिक ग. ल. ठोकळ यांच्यासह शालेय पाठ्यपुस्तकाच्या क्रमिक अभ्यासक्रमासाठी असलेल्या मंगलवाचन या पुस्तकाचे संपादनही केले. तसेच त्यांनी मराठी चित्रपटांच्या 13 कथा तर हिंदी चित्रपटांच्या 10 कथा लिहिल्या. तसेच “सुनबाई’ या चित्रपटासाठी गीते लिहिली. सन 1959 मध्ये त्यांनी “ययाती’ ही कादंबरी लिहून साहित्य दरबारात आपलं स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ केलं.
“ययाती’ या कादंबरीची मूळ कथा महाभारतातील असून, ती कथा अनेक पुराणातही आढळते. त्यांनी मूळ कथेत बदल करून ती कथा वर्तमानाशी जोडली. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ययातीची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तीकथा यांचा संगम म्हणजे ययाती कादंबरी. त्यांच्या या कादंबरीने साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) प्रभावित झाले व त्यांनी “ययाती आणि देवयानी’ हे नाटक लिहिले तर लेखक भगवतीचरण वर्मा यांनी या कादंबरीवरून “चित्रलेखा’ ही हिंदी कादंबरी लिहिली. या कादंबरीविषयी एकदा प्रा. नरहर कुरुंदकर बोलताना म्हणाले, की खांडेकर यांची “ययाती’ ही आधुनिक माणसाच्या नव्या अकांक्षांची कथा आहे. “ययाती’ या कादंबरीला 1960 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार तर 1974 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. तसेच 1941 मध्ये सोलापूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात तर 1957 मध्ये सातारा येथे झालेल्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना बहुमान मिळाला. सन 1968 मध्ये त्यांना पद्मभूषण या नागरीसन्मानाने गौरवण्यात आले. 2 सप्टेंबर 1976 रोजी मिरज येथील वॉलनेस रुग्णालयात त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने साहित्याच्या नभांगणातील एक ज्ञानपीठाचा ज्ञानतपस्वी अंतर्धान पावला.
– अमेय गुप्ते