मी यापूर्वी रंग या विषयावर लेख लिहिल्यानंतर अनेक वाचकांनी इतर ज्ञानेंद्रियांद्वारा होणाऱ्या संवेदनांविषयी लिहिण्याची विनंती केली. त्यामुळे आज आपण घ्राणेंद्रियामार्फत होणाऱ्या संवेदनेविषयी चर्चा करू. भगवद्गीतेत पंच ज्ञानेंद्रियांनी होणाऱ्या संवेदनांचा उल्लेख आहे :
श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते।।15.9।।
म्हणजेच कान, नाक, त्वचा (स्पर्श), जिव्हा आणि नाक या इंद्रियांद्वारे आपल्याला संवेदना होते.
पण प्राण्यांना गंध संवेदनेची आवश्यकता का असावी? जगण्यासाठी आणि वाढीसाठी अन्न आवश्यक असतं. ते सेवन करण्यायोग्य आहे की नाही याचं ज्ञान गंध संवेदनेनं होतं (अर्थात यातही फसगत होऊ शकते). संकटाची चाहूलही कित्येकदा गंधाद्वारे होते. तसंच मादी जोडीदाराच्या प्राप्तीसाठीही अनेक प्राणी गंध संवेदनेची योजना करतात. गंध संवेदना चव घेण्याच्या कामीही मदत करते.
मी स्वतः पाहिलेलं आहे की कुत्र्यांना पकडण्यासाठी ज्या विशिष्ट लोकांची योजना महापालिकेद्वारे केली जाते त्यांचा एक-दोनदा अनुभव घेतल्यावर ते लोक पुन्हा आले की कुत्र्यांना गंधांद्वारे चाहूल लागते आणि ती सैरावैरा पळू लागतात, भुंकू लागतात. गुरांसह अनेक जनावरं अन्नग्रहण करण्याआधी ते हुंगून खाण्यायोग्य आहे की नाही याची खातरजमा करून घेतात. आपल्यालाही अन्न आंबलेलं किंवा खराब झालेलं असलं की त्याचं ज्ञान वासाद्वारे होतं. आवडता पदार्थ समोर आला की त्याच्या वासानं लाळ सुटते, त्यामुळे तो पदार्थ ग्रहण केल्यावर त्याची चव घेण्यास मदत होते एवढंच नव्हे तर ही प्रक्रिया पचनासही उपयुक्त ठरते.
गंधाची संवेदना नासिकेतील ग्राहक चेतांमुळे होते. या चेता गंधकणांना बांधून ठेवतात आणि त्यामुळे निर्माण झालेले विद्युतसंदेश मेंदूकडे पोचवले जातात आणि आपल्याला गंधाचं ज्ञान होतं. ते ज्ञान मेंदूतील दुसऱ्या एका केंद्राकडे पाठवलं जातं. हा गंध योग्य की अयोग्य हे तिथे ठरवलं जातं आणि संबंधित अवयवप्रणालीला त्यानुसार आज्ञा केली जाते आणि आपण तद्नुषंगिक कृती करतो. अगदी वेगळ्या पद्धतीनं अनेक वनस्पतीसुद्धा गंधज्ञान प्राप्त करतात. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की काही बाष्पनशील (व्होलाटाइल) पदार्थांचं ज्ञान वनस्पतींना त्यांच्या तंतूंद्वारे होतं आणि त्या (विशेषतः परजीविक) वनस्पती ती जागा अयोग्य असल्यास इतरत्र रुजतात.
मानवासह सर्व सस्तन प्राणी नाकानं वास घेतात. पक्ष्यांच्या चोचीजवळील छिद्रात गंधग्राहक चेता असतात. कीटक त्यांच्या शरीरावरील छिद्रांतून तसंच शृंगिकांतून (मिशा) गंधज्ञान घेतात तर पालीसारखे सरीसृप प्राणी जिभेवर गंधकण घेतात आणि जबड्याच्या वरच्या भागाला जीभ टेकवल्यावर त्यांना गंधाची संवेदना होते. माशांसारख्या जलचरांच्या सर्व शरीरावर गंधचेता अस्तित्वात असतात त्यामुळे पाण्यातील रसायनांचं ज्ञान त्यांना त्वरित होतं. एका विशिष्ट जातीच्या पतंगाला मादीनं प्रसारित केलेल्या एका रेणूचीही गंध संवेदना होते ते इतके संवेदनशील असतात.
अनेक प्राणी गंधज्ञानाबरोबर इतर संवेदनांचा उपयोग करून आवश्यक ती माहिती मिळवतात. काही प्राण्याची गंध संवेदना अतिशय तीव्र असते. ब्लड हाउंड किंवा सेंट हाउंड या प्रजातीतील कुत्र्यांची ही संवेदना मानवापेक्षा एक कोटी पटीनं अधिक असते तर अस्वल आणि हत्ती यांची गंध संवेदना याहीपेक्षा जास्त तीव्र असते. याच कारणानं विशिष्ट प्रजातीच्या कुत्र्यांचा गुन्हेगारांचा किंवा अमली पदार्थांचा शोध घेण्याकरता वापर केला जातो.
सत्य हे आहे की गंध ज्ञान हे रसायनाचे रेणू चेतांशी बांधल्यामुळे होतं. या तत्त्वाचा आधार घेऊन कृत्रिम नासिकाही शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. विविध रेणू ओळखण्याची त्याची क्षमता आहे आणि ही क्षमता वाढवण्यावर शास्त्रज्ञांचा सध्या भर आहे. काही रेणू जंतूंशी संलग्न असतात त्यामुळे अशा नासिकेचा फार मोठा उपयोग होणार आहे. दोनेक वर्षांपूर्वी करोनाचा मोठा उद्रेक झाला होता आणि त्यात असंख्य माणसं दगावली होती. करोनाचं एक लक्षण म्हणजे गंधसंवेदनेचा अभाव. करोनाच्या विषाणूशी संबंधित रेणू आणि त्यांचं वातावरणातील प्रमाण जर आपल्याला वेळीच कळलं तर अशा महाभयानक साथीचा सामना करणं खूप सोपं जाईल. म्हणून गंधज्ञान केवळ सुगंध/दुर्गंध यांच्यापर्यंत सीमित नाही तर सामान्य आरोग्याशी आहे.
– श्रीनिवास शारंगपाणी