Rohit Pawar on Ajit Pawar। राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आता जागावाटपावरून चर्चा सुरु आहेत. हे सगळं सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी “अजित पवार गटाच्या 18-19 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असल्याचे म्हटले आहे. मात्र शरद पवार त्यातल्या 10 ते 12 आमदारांनाच घेतील असंही रोहित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जयंत पाटील विधीमंडळात होते, त्यावेळी अजित पवार गटाचे काही आमदार तिथे जाऊन त्यांना भेटल्याच्या चर्चा होत्या. त्यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय, याविषयी बोलताना, ” जयंत पाटील खूप अनुभवी नेते आहेत. त्यामुळे कसं, कधी, कोणतं कार्ड बाहेर काढायचं? हे त्यांना खूप चांगलं माहीत आहे. त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे. पुढे बघा काय होतंय. शरद पवार तर, राजकारणात, महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षाही फार पुढे आहेत हे लोकसभा निवडणुकांमध्ये साहेबांनी दाखवून दिलंच आहे. विधानसभेत तर ते आणखी जास्त दाखवतील. असे त्यांनी म्हटलं.
भाजप अजित पवारांचे राजकारण संपवणार Rohit Pawar on Ajit Pawar।
अजित पवारांना विरोध होताना पाहायला मिळतंय, पुण्यानंतर इंदापूरमध्ये एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांचं नाव घेऊन विरोध दर्शवला. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतोय की भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं आणि अजित पवारांच्या बाबतीत तेच होणार आहे. आता नेतेदेखील अजित पवारांबाबत खूप बोलतात. पण ते फारसं सकारात्मक नसतं. अशातच आता कार्यकर्त्यांनाही धाडसं आलं आहे अजित पवारांबाबत बोलायला. मग आता हे ठरलंय की, मुद्दाम केलं जातंय. अजित दादांना वेगळं करायचं. सर्व जागांवर अजित दादांना उभं करायचं. पाडण्यासाठी उभं करायचं. शरद पवारांचा पक्ष आहे, त्यांची मतं खाण्यासाठी उभं करायचं. पण आमदार एवढे खुळे नाहीत ना? त्यांनाही माहीत आहे, भाजप त्यांचा कसा वापर करणार आहे. त्यामुळे एकतर अजित पवार भाजपसोबत राहिले तर त्यांना 20 ते 22 जागा दिल्या जातील. आणि जर ते भाजपसोबत नाही राहिले तर मात्र सगळ्या जागांवर त्यांचे आमदार उभे राहतील, पण निवडून मात्र कोणीच येणार नाही.”अशी माहिती त्यांनी दिली.
शरद पवारांकडे येणाऱ्या आमदारांचा आकडा 20 च्या पुढे Rohit Pawar on Ajit Pawar।
अजित पवारांकडून शरद पवारांकडे किती आमदार येतील? यावर बोलताना रोहित पवार यांनी, “चर्चेत तर अनेक आहेत, पण शरद पवार गटात येणाऱ्या आमदारांचा आकडा हा 18, 19, 20 च्या पुढे आहे. घ्यायचं कोणाला हे शरद पवार आणि जयंत पाटील ठरवतील. काही आमदार खूप आधीपासूनच संपर्कात आहेत. त्यांना अनेक वेगळ्या गोष्टींमध्ये अडकवलं जाईल. त्यांच्या नातेवाईकांना अडकवलं जाईल, त्यामुळे काही आमदार तिकडे गेले आहेत. ते आमदार विचाराचे पक्के आहेत, पण भितीपोटी ते तिकडे गेले आहेत, अशा आमदारांचा विचार केला जाईल, असा शरद पवारांच्या स्वभावावरुन मला वाटतोय.” असेही रोहित पवारांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, रोहित पवारांच्या दाव्यानंतर आता महाराष्ट्राला विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार की, काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा
धक्कदायक ! राज्यात 4 महिन्यांत 838 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ; निवडणुकीच्या धुराळ्यात सरकारचं दुर्लक्ष