Jitendra Awhad On Ajit Pawar| देशभरात सध्या नीट परीक्षा घोटाळ्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणातील दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणातील काही संशयितांना अटक देखील करण्यात आली आहे. या मुद्यावरून सरकारवर देखील विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थींनी आंदोलने देखील केली. यादरम्यान आता शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. तसेच त्यांनी यावेळी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
“एमबीबीएस सारख्या परीक्षेत गुणवत्ता तपासली न जाता केवळ वशिल्यावर घेणार असाल, तर या देशाच भविष्य अंधारात आहे. शिक्षणाची एवढी वाईट अवस्था मागच्या 70-75 वर्षाच्या इतिहासात कधीच झाली नव्हती. ” अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी टीका केली.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत देखील भाष्य केले. “अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबई-पुण्यातील नीटच्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे, असं ते म्हणाले. भेट कसली घेता? तुम्ही त्या सरकारमध्ये सहभागी आहात. तुमच्या मित्र पक्षांचे मंत्री आहेत. केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा मागा, नाहीतर तुम्ही राजीनामा द्या. पोरांच्या आयुष्याशी खेळू नका. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि केंद्रातील सरकारला वठणीवर आणा अशी मागणी त्यांनी केली.” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
सरकारने प्रायश्चित घेतलं पाहिजे
“पुढे जाऊन हेच MBBS चे विद्यार्थी गायनॅक, न्यूरो सर्जन बनणार आहेत. तुमच शरीर त्यांच्या हातात देणार ते काय काम करणार? 5, 10 कोटी रुपये देऊन अशिक्षित माणूस डॉक्टर बनणार असतील तर ते तुमच्या पोटाऐवजी छातीच ऑपरेशन करतील. मस्करी लावली का? तुम्ही जनतेसोबत खेळत आहात. हे डॉक्टर पुढे जाऊन काय काम करणार? विद्यार्थ्यांच वर्ष वाया गेलं. त्यांच्या मेहनतीच काय करणार? सरकारने प्रायश्चित घेतलं पाहिजे. सरकारने सत्य सांगितलं पाहिजे. मोठ्या महत्त्वाच्या परीक्षेची जबाबदारी प्रायव्हेट एजन्सीला कशी देता? हा तुमच्या घरचा विषय आहे का?”, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :
”उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन” उद्धव ठाकरेंची खोचक टीका