नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील जनतेला उद्देशून भावनिक पत्र लिहिले. अपरिचित असूनही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. जेव्हा मी दररोज टीकाटिप्पणीला सामोरा जात होतो; तेव्हा तुमच्या बिनशर्त प्रेमाने माझे रक्षण केले, असे राहुल यांनी म्हटले.
राहुल यांनी मागील वेळी (वर्ष 2019) वायनाड आणि उत्तरप्रदेशच्या अमेठीतून निवडणूक लढवली. त्यांना अमेठीतून पराभव पत्करावा लागला. मात्र, वायनाडने हात दिल्याने ते खासदार बनले. यावेळीही राहुल वायनाड आणि उत्तरप्रदेशातील रायबरेली अशा दोन मतदारसंघांमधून लढले. दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले. त्यामुळे दोन्हीपैकी एक मतदारसंघ सोडणे त्यांच्यासाठी अनिवार्य बनले. त्यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या निर्णयाबद्दल अजूनही खंत वाटत असल्याचे त्यांच्या पत्रातून स्पष्ट झाले.
आपण कुठल्या समुदायाचे, धर्माचे आहोत, कुठली भाषा बोलतो यांसारखा कुठलाही विचार न करता तुम्ही माझ्याविषयी आपुलकी दाखवली. तुम्ही माझ्यासाठी आश्रयस्थान, घर आणि कुटूंब बनलात. तुमचे आभार कसे मानावेत तेच समजत नाही, अशी भावना राहुल यांनी व्यक्त केली. राहुल यांच्या निर्णयामुळे वायनाडमध्ये पोटनिवडणूक होईल. ती पोटनिवडणूक त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी लढवणार असल्याचे कॉंग्रेसने याआधीच जाहीर केले आहे.