मुंबई : लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसला मिळालेल्या यशानंतर खासदार राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते या नव्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेसोबत संवाध साधला. ‘जोडो भारत यात्रे’दरम्यान राहुल गांधींनी देशभर दौरा केला होता. आता राहुल गांधी हे पायी वारीत सामील होणार असल्याची माहिती आहे.
पुढच्या महिन्यात 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. या वारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ राहुल गांधीही महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत. याबाबत दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठीकडून पंढरपूर येथील शिरस्थ पदाधिकारी यांच्याकडे वारीबाबत माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकल्या होत्या. त्यात आता राज्यात येत्या तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येईल. तसेच यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील वाढू शकतो.
शरद पवारही होणार सहभागी
पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. या वारीत साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. बारामती ते इंदापूरच्या सणसरपर्यंतचे तब्बल 17 किलोमीटरचे अंतर शरद पवार पायी चालणार आहेत. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलै रोजी ही मंडळी बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. शरद पवार आणि राहुल गांधी हे दोन बडे नेते वारीत सहभागी झाल्यास मोठे राजकीय शक्तीप्रदर्शन होऊ शकते.